आचारसंहिता जाहीर करण्याची नेत्यांनाच घाई; मंत्र्यांनीच सांगितली तारीख

आचारसंहिता जाहीर करण्याची नेत्यांनाच घाई; मंत्र्यांनीच सांगितली तारीख

मुंबई : आज गणेशाच्या आगमनाची लगबग संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असली तरी, नेतेमंडळींना गणरायबरोबरच विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. किंबहुना विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी नेतेमंडळी गणरायाला साकडे घालणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार असल्याचा अंदाज संपूर्ण महाराष्ट्राला आहे. साधारणपणे निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्याचं काम निवडणूक आयोगाचं असताना भाजपमधील नेते मंडळीच आता आचारसंहिता जाहीर करण्यासाठी सरसावले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गणेशोत्सवानंतर आचारसंहिता जाहीर होईल, असं वक्तव्य केलं होतं. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील निवडणूक आचारसंहितेविषयी वक्तव्य केले आहे.

आधी मुनगंटीवार आता दानवे
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय यांत्रांचा धुरळा उडाला आहे. यात्रा आणि जाहीर सभांनी उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपच्या जनसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप काल सोलापुरात झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या समारोपाच्या सभेला हजेरी लावली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य केले. आरोप-प्रत्यारोपांच्या या फेरी सुरू असताना, येत्या १३ सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल, असं केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना जाहीर करून टाकलंय. जालना या त्यांच्या मतदारसंघातच त्यांनी ही माहिती दिली असून, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दानवे यांनी स्थानिक पातळीवरील ओबीसी मेळाव्यात याची माहिती दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, निवडणूक आयोगाच्या आधीच एखादा मंत्री आचारसंहितेसंदर्भात माहिती कसा काय देतो, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. विरोधकांनीही यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री असलेले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही दोन दिवसांपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची संभाव्य तारीख जाहीर केली होती. त्यांनी १५ ऑक्टोबरच्या आसपास निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला होता.

युती होणार की नाही? 
गेल्या दोन दिवसांत विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही, यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेवर भाजपचाच झेंड फडकणार  असल्याचं म्हटलंय. त्यात त्यांनी शिवसेनेचा उल्लेख टाळला असल्याने चर्चांना उधाण आलंय. जर, युती झाली नाही तर अनेक विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितं बदलणार आहेत. भाजप आणि शिवसेनेचे नेते युती होणारच, असे ठामपणे सांगत असले तरी, नेत्यांमध्ये स्वतंत्र लढवण्याविषयी कुजबूज सुरू झाल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com