Abhishek Bachchan Birthday : कुणी काही म्हटलं तरी अभिषेक बच्चनचा तो फ्लॉप प्रवास कुणापासून लपून राहिला नव्हता. रेफ्युजीमधून डेब्यू करणाऱ्या अभिषेकला त्याच्या करिअरमध्ये सुपरहिट, ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी खूप काळ वाट पाहावी लागली. त्याला आजवर खूप मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. मात्र त्याला तो घाबरला नाही. हिमतीनं उभा राहिला.
असं म्हटलं जातं की, अभिषेकवर नेहमीच त्याच्या वडिलांच्या महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाचा प्रेशर राहिला. त्या दबावामुळे त्याला कित्येक अपयशाची मालिका पचवावी लागली. बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा म्हणून अभिषेक बच्चनकडे पाहिले गेले. त्याचा परिणाम असा की, त्यानं काही वेगळ्या विषयांवरील जे चित्रपट केले त्याकडे देखील प्रेक्षकांनी अमिताभ बच्चन यांचा मुलगा म्हणून त्याच्याकडे पाहिले. त्याची आणि बिग बी अमिताभ यांची तुलना त्याला मारक ठरल्याचे बोलले जाते.
अभिषेक बच्चनचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं आपण त्याच्याविषयीच्या काही महत्वाच्या आणि रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. अमिताभ बच्चन यांच्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या आड तो नेहमीच झाकोळला गेला असेही त्याच्याविषयी बोलले जाते. अभिषेकनं त्याच्या आजवरच्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये ३० पेक्षा जास्त चित्रपट केले. मात्र त्यातील बोटावर मोजण्या इतपत चित्रपटांमध्ये तो प्रेक्षकांना भावला.
रेफ्युजी हा अभिषेकचा पहिला चित्रपट होता. जेपी दत्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये पहिल्यांदा अभिषेकनं मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यानं काही अंशी लक्ष वेधून घेतले होते. यानंतर त्यानं काही विनोदी, गंभीर, सस्पेन्स, थ्रिलर, अॅक्शन चित्रपटांमध्येही काम केले पण त्यातही त्याला म्हणावे असे यश मिळाले नाही.
जेव्हा मणिरत्नम यांचा गुरु नावाचा चित्रपट झाला तेव्हा अभिषेकही लंबी रेस का घोडा है, त्याच्यातही अभिनयाची वेगळी क्षमता आहे असे प्रेक्षकांना वाटले आणि तो चित्रपट त्याच्या करिअरसाठी महत्वाचा ठरला. त्या चित्रपटामध्ये त्यानं साकारलेली एका बड्या उद्योगपतीची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ठरली. कधी नव्हे तर समीक्षकांनी देखील त्या भूमिकेचे कौतुक केले. त्याच्या सोबत पत्नी ऐश्वर्याची तितकीच मोलाची साथ त्याला मिळाली होती.
दुसरीकडे असंही म्हटलं जातं की, अभिषेकनं त्याच्या करिअरमध्ये एकापाठोपाठ १५ चित्रपट फ्लॉप दिल्यानंतरही त्यानं हार मानली नाही. काही झालं तरी आपण आपली वेगळी ओळख निर्माण करुन दाखवायची असा त्याचा होरा होता. त्या जिद्दीनं तो काम करु लागला. आणि त्यात त्याला यशही आले. सध्या तो घूमर नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्यासाठी त्याला फिल्मफेयर पुरस्कारानं गौरविण्यातही आले.
२००० मध्ये रेफ्युजीपासून अभिषेकचा प्रवास सुरु झाला तो पुढे ढाई अक्षर प्रेम के, तेरा जादू चल गया, हा मैंने भी प्यार किया है, सारख्या चित्रपटांनी त्याची प्रतिमा वेगळीच झाली. त्यातून त्याचा अभिनय प्रेक्षकांना फारच निराश करुन गेला होता. मात्र या चित्रपटांनी त्याला खूप काही शिकवले. अभिनयाचे वेगळे धडे घेत तो पुन्हा उभा राहिला. सेलिब्रेटी किड्सवर नेहमी होणारी टीका अभिषेकवरही होत राहिली. मात्र त्यानं सगळ्यावर मात केली.
अभिषेकनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, एका महिलेनं त्याचा अभिनय पाहिल्यावर त्याला अभिनय क्षेत्र सोडण्यास सांगितले होते.मी माझ्या वडिलांचे नाव खराब करतो आहे. असे त्या महिलेचे म्हणणे होते. अशा प्रसंगांचा सामना करत अभिषेकनं त्याची वेगळी वाट निर्माण केली आणि आता वेगळ्या धाटणीचा अभिनेता म्हणून समोर आलेला दिसतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.