अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आणि जया बच्चन(Jaya Bachchan) यांचा सुपूत्र अभिषेक बच्चन आज इतक्या वर्षानंतरही बॉलीवूडमध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडतोच आहे. अभिषेकच्या लग्नाआधी त्याला अमिताभ-जया बच्चन यांचा मुलगा म्हणून अधिक फेम होतं तर लग्नानंतर विश्वसुंदरी सुपरस्टार ऐश्वर्या रायचा नवरा म्हणून त्याची ओळख बनली. ही तीन नावं त्याच्या बाजूला नसतील तर तसं त्याचं अस्तित्व ना के बराबर. आता त्याची अॅक्टिंग चांगली नाही असं म्हणूनही चालणार नाही,त्याचा प्रत्येक सिनेमातला प्रयत्न चांगला असतो. पण बिचा-याची नेहमीच त्याच्या स्वत:च्या वडिलांसोबत तुलना केली जाते आणि मग पुन्हा त्याच्या पदरी निराशा येते. बरं ऐश्वर्यासोबत सिनेमा करूनही सारा भाव ऐश्वर्याच खाऊन गेली याचं उदाहरण म्हणजे 'गुरू'. आता तो तरी बिचारा काय करणार सगळ्याच बाजूने कोंडी झाली तर.
नुकतंच एका मुलाखतीत त्यानं त्याच्या आयुष्यात करिअरच्या बाबतीत घडलेल्या पहिल्या चुकीबद्दल उघडपणे वक्तव्य केलंय. तो म्हणाला,"माझा पहिला सिनेमा जे.पी.दत्ता दिग्दर्शित 'रेफ्युजी' होता. तो मी स्विकारला तिथेच मी चुकलो. खरंतर त्यावेळी मी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास तयार नव्हतो. तरीही मी सिनेमा स्विकारला. जे.पी.दत्तां सारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करताना मी परफेक्ट तयारीनीशी उतरायला हवं होतं. पण मी सगळं खुप हलक्यात घेतलं. मी जास्त मेहनत केली असती,मनाची तयारी केली असती आणि मग सिनेमा केला असता तर अधिक चांगलं करू शकलो असतो. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मी कामाबाबतीत फार गंभीर नव्हतो. मला वाटलं सगळं सोपं आहे,माझ्याकडून सहज होऊन जाईल.
पण तसं नसतं,प्रत्येक गोष्ट करताना मेहनत,चिकाटी आणि कामाबाबतीत आत्मीयता,गंभीरपणा असावाच लागतो. माझ्यात ते काहीचं नव्हतं आणि मी माझे 100टक्के रेफ्युजी करताना देऊ शकलो नाही. आणि सगळंच पुढे चुकलं. चांगलं कथानक असूनही रेफ्युजी चालला नाही. बरं यातनंही मी शिकलो नाही,त्यानंतर मी आणखीही करिअरच्या बाबतीत ब-याच चुका केल्या. पण गेल्या 20 वर्षात मी ब-याच गोष्टी शिकत गेलो आणि आता त्या केलेल्या चुका पुन्हा माझ्याकडून होऊ नयेत म्हणून मी प्रयत्नशील असतो. सुरुवात चांगली नाही झाली हरकत नाही पण शेवट नेहमी चांगलाच करायचा असतो,असंही त्याने नमूद केलं". रीफ्युजी सिनेमात अभिषेक सोबत करिना कपूर लीड अभिनेत्री म्हणून होती. तिचाही तो पहिलाच सिनेमा होता. या सिनेमात जॅकी श्रॉफ,सुनिल शुट्टी,अनुपम खेर अशी मल्टीस्टारकास्ट होती.
अभिषेकने आतापर्यंत 60 सिनेमांमध्ये काम केलंय. 'ढाई अक्षर प्रेम के,LOC कारगिल,जमिन,रन,हम तुम,बंटी और बबली,धूम,सरकार,कभी अलविदा ना कहना,दिल्ली 6,पा,रावन,द बिग बुल' अशी काही त्याच्या सिनेमांची नावं आहेत. अभिषेक आता आगामी 'बॉबी बिस्वास' मध्ये दिसणार आहे. या सिनेमाला दिव्या अन्नपुर्णा घोषनं दिग्दर्शित केलंय. या सिनेमासाठी अभिषेकनं आपलं वजन जवळ-जवळ 100 ते 105 किलो केलं होतं. 3 डिसेंबरला zee5 वर या सिनेमाचा प्रिमिअर होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.