Mrs Chatterjee Vs Norway:
राणी मुखर्जीचा नवा सिनेमा मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे (Mrs Chatterjee Vs Norway) सिनेमाचा ट्रेलर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. ट्रेलर जसा प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हापासून सिनेमाची जबरदस्त चर्चा आहे.
राणी मुखर्जीचा हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. हि सत्य घटना एका भारतीय जोडप्यासोबत घडली होती. काय होती ती घटना? कोण होतं ते कुटुंब? वाचा सविस्तर..
काय होती ती घटना?
2007 मध्ये भू - भौतिकशास्त्रज्ञ (geophysicist) अनुरूप भट्टाचार्य यांच्याशी लग्न केल्यानंतर सागरिका भट्टाचार्य नॉर्वेला गेली. पण 2008 मध्ये ती आपल्या पहिल्या मुलाच्या बाळंतपणासाठी कोलकाता येथील घरी परतली.
कोलकात्याला तिने मुलगा अभिज्ञानला जन्म दिला. सागरिका तिच्या मुलासोबत कोलकाता येथे सुमारे एक वर्ष राहत होती. अभिज्ञान मोठा होत असताना सागरिकाला समजले की तिच्या मुलामध्ये ऑटिझमची लक्षणे आहेत, जो एक मेंदूचा विकार आहे.
हे पाहून सागरिका 2009 मध्ये पती अनुरूप सोबत नॉर्वेला गेली, जेणेकरून मुलावर व्यवस्थित उपचार व्हावेत. त्यावेळी अभिज्ञान केवळ 14 महिन्यांचा होता. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि कालांतराने त्याची प्रकृती बिघडली.
त्यानंतर 2010 मध्ये सागरिका आणि अनुजने मुलाला नॉर्वेमध्येच एका फॅमिली किंडरगार्डनमध्ये ठेवले. तोपर्यंत सागरिका पुन्हा आई होणार होती.
काही काळानंतर सागरिकाने मुलगी ऐश्वर्याला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर, सागरिकासाठी अधिक कठीण झाले कारण नंतर ती मोठा मुलगा अभिज्ञान जो ऑटिझम आजाराने त्रस्त आहे त्याला जास्त वेळ देऊ शकली नाही.
तरीही सर्व काही सुरळीत सुरु होते. पण 2011 मध्ये सागरिका आणि अनुज यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. जेव्हा नॉर्वेच्या चाइल्ड वेलफेअर सर्व्हिसेस त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन गेले.
पालक मुलांसोबत एकाच बेडवर झोपतात आणि मुलांना जबरदस्तीने खायला घालतात, असा आरोपही त्यांनी केला सागरिका आणि अनुरूप भट्टाचार्यवर केला.
नॉर्वेच्या बाल संगोपन संस्थेने बाळांना हाताने दूध पाजणे, एकत्र झोपणे आणि त्यांना दही खाऊ घालणे चुकीचे ठरवले. भारतीय संस्कृतीत या गोष्टी खूप साधारण होत्या.
पुढे अनुरूपने सांगितले कि या संस्था अशाच वागतात कारण त्यांना मुलांना आपल्या ताब्यात घ्यायचे आहे आणि नंतर त्यांना त्यांच्या देशाचे नियम आणि कायदे पाळायला लावायचे आहेत.
बाल संगोपन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सागरिका आणि अनुज यांच्यावर त्यांच्या मुलांवर अत्याचार केल्याचा, त्यांना व्यवस्थित न ठेवल्याचा आरोप केला होता. सागरिका आणि अनुजचे वाईट दिवस सुरू झाले होते.
सागरिका आणि अनुजला त्यांची मुले परत मिळवण्यासाठी नॉर्वेयन व्यवस्थेशी आणि शासकीय यंत्रणांशी मोठा लढा दिला. त्यासाठी त्यांना भारत सरकारचीही मदत घ्यावी लागली.
सागरिका आणि अनुरूप यांना त्यांची स्वतःची मुले परत मिळवण्यासाठी दोन वर्षे लागली. दोन वर्ष मुलांपासून दूर राहिलेले सागरिका आणि अनुरूप यांना कोणत्या मानसिक अवस्थेला सामोरे जावे लागले असेल याची कल्पना करणं कठीण आहे .
हीच धक्कादायक घटना राणी मुखर्जीच्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे (Mrs Chatterjee Vs Norway) सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 17 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होतोय.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.