- प्रा. संदीप गिऱ्हे
The Kerala Story Vipul Amrutlal Shah Sudipto Sen : ‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटाबद्दल सध्या बरीच चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चा मुख्यत: दोनच बाजूच्या आहेत. एक चित्रपटाच्या बाजूने आणि दुसरी विरोधी बाजूने. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, भाजप आयटी सेलच्या प्रमुख्यांपासून ते सामान्य भाजप कार्यकर्त्यांची एक बाजू आहे.
सत्य घटनांवर आधारित, भयानक सत्य, लव जिहाद, धर्मांतर, आतंकवाद या अर्थाने चर्चा करणारी ही बाजू. तर याउलट कॉंग्रेसचे काही नेते, केरळचे मुख्यमंत्री, त्यांचा पक्ष, काही मुस्लीम संघटना, राजकीय संघटना यांची दुसरी बाजू. हे साफ खोटं आहे, मुस्लीम द्वेष, भाजपचा प्रोपगंडा, अशी मुलगी दाखवा आणि एक कोटी मिळावा अशी चर्चा असलेली दुसरी बाजू. या दोन्ही बाजू एकदम दोन्ही टोकाच्या आणि एकांगी आहेत.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सध्याच्या वातावरणातील भारतीय लोकांची मानसिकता, वैचारिक पातळी, चर्चेचा स्तर, समूह भान हे सर्वच विषयांच्या आणि घटनांच्या बाबतीत टोकाचे आणि एकांगी आहे. कुठल्याही विषयाच्या मांडणी किंवा चर्चेमध्ये त्या विषयाच्या मध्यबिंदू पासून दूर परीघाकडे आणि वैचारिक कट्टरतेकडे जाणे यासाठी राजकीय परिभाषेमध्ये ‘पोलरायझेशन’ ही संकल्पना आहे. एखाद्या व्यक्तीचं सार्वजनिक व राजकीय चर्चेमध्ये एकाच राजकीय पक्षाच्या विचारधारेच्या प्रभावातून एकांगी मतप्रदर्शन होणे किंवा करणे असं ढोबळमानाने या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे.
‘द केरळा स्टोरी’चा टीझर/ट्रेलर ज्या युट्यूब चॅनेलवर रिलीज झाला त्याखालील कमेंट वाचल्या तर हा मुद्दा अधिक स्पष्टपणे लक्षात येईल. या चित्रपटाबद्दल कमेंटमध्ये (इतर माध्यमातही) लोकांनी व्यक्त केलेली मते - विचार एकांगी, टोकाचे, कट्टर, अवास्तव, अतिशयोक्ती वाटणारे आहेत.
आपण या परिस्थितीपर्यंत एक दोन दिवसात आलेलो नाही. या आधी या मातीचा इतिहास एवढा एकांगी कधीच नव्हता. ही किमया साध्य केली मागील काही वर्षात पद्धतशीर राबवलेल्या प्रोपगंडाच्या विविध मोहिमांनी. निवडक तथ्ये आणि खऱ्या खोट्या माहितीचे बेमालूम मिश्रण म्हणजे प्रभावी प्रोपगंडा. आपल्याला हवी तेवढीच बाजू मांडणे, समोरच्याला शत्रू - विरोधक - सैतान - राक्षस असं पूर्णतः काळ्या रंगात रंगवणे, भडक वक्तव्य करणे व यातून लोकांमध्ये भीती निर्माण करणे आणि वास्तविक व दररोजच्या प्रश्नांपासून (केंद्रबिंदूपासून) लोकांना दूर (परीघाकडे) नेण्यासाठी हे उपद्व्याप केले जातात. यासाठी शिक्षण व माध्यमांचा पुरेपूर वापर केला जातो.
शिक्षणाचा वापर प्रबोधना ऐवजी विशिष्ट विचारांच्या प्रचारासाठी होत असतांना दिसत आहेच. सध्या टीव्ही न्यूज चॅनेलवरच्या बातम्या काय दाखवत आहेत ते आपण पाहतोच आहोत. वर्तमानपत्रांमध्ये हवी ती माहिती राजरोसपणे पेरली जात आहे. चित्रपट हेही प्रोपगंडासाठी वापरले जाणारे प्रभावी माध्यम. या माध्यमाचा उपयोग विशिष्ट प्रतिमांचे प्रमाणीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणत होतो. २०१० ते २०१२ या काळात अनेक चित्रपटांनी तत्कालीन कॉंग्रेसप्रणीत सरकारचे ‘भ्रष्ट्राचारी सरकार-घोटाळा सरकार’ अश्या प्रतिमेचे प्रमाणीकरण केले.
यामध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटांचा मोठा वाटा होता. या सर्व घोटाळ्यांचे पुढे काय झाले ? २०१४ नंतर अक्षय कुमारच्या चित्रपटांमधून भ्रष्ट्राचार हा विषय गायब झाला आणि देशभक्ती, हिंदू विरद्ध मुस्लीम, भारत विरुद्ध पाकिस्तान, सरकारी योजनांशी मिळत्या जुळत्या कथानकांची मोठी परंपरा निर्माण झाली. हीच बाब अजय देवगण व इतरांसाठी लागू होणारी आहे. इथे उदाहरण म्हणून मुद्दाम कुठल्याही चित्रपटाचा उल्लेख केलेला नाही. एवढी तसदी वाचकांनी आपल्या बुद्धीला द्यावी अशी अपेक्षा आहे. त्याचे कारणही प्रोपगंडासाठी वापरले जाणारे तंत्र हेच आहे.
प्रचार न वाटता नकळतपणे सामान्य माणसांच्या मनावर वा विचार - भावनांवर परिणाम साधने हे प्रोपगंडाचे मुख्य वैशिट्य होय. नाझी काळामध्ये हिटलरने आपल्याला हवा असलेला परिणाम साधण्यासाठी एक हजार पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केली होती. यामधून ज्यू म्हणजे किळसवाणे, अस्वच्छ, घाणेरडे, क्रूर, देशद्रोही अशी प्रतिमा निर्मिती केली गेली. यातून लाखो ज्यू लोकांचे शिरकाण केले गेले. कट्टर आणि एकांगी व्यवस्थेमध्ये प्रोपगंडा हा हिंसेला पर्याय नसतो तर हिंसेचाच एक भाग असतो. या एकांगी टप्यावर आज आपण आलो आहोत ? पुढे ज्यू सारखे किती लाख मुस्लिमांचे शिरकाण आपण करणार आहोत ? हे थांबवता येणे आपल्याला शक्य होणार आहे का?
मूळ प्रश्नाला भिडणे हा ‘द केरळा स्टोरी’ सारख्या चित्रपटांचा उद्देश वा ‘मोटिव्ह’ असतो का किंवा आहे का ? का तसा फक्त चित्रात्मक आभास निर्माण केला जातो ? या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे ‘द केरळा स्टोरी’ हा चित्रपट पाहून किंवा न पाहून मिळणार नाहीत. न्यायधीश एखाद्या खटल्याचा निकाल लावण्यासाठी घडलेल्या गुन्ह्याच्या पाठीमागे काय उद्देश वा मोटिव्ह होता याच्या शोधात असतात. या बाबतीतही आपण ‘द केरळा स्टोरी’ च्या निमित्ताने घोंगावणाऱ्या वादळी चर्चे मागील उद्देश वा मोटिव्ह समजून घेण्याचा प्रयत्न केला तर यातील काही प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील.
(या लेखाचे लेखक न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.