200 किलोमीटरची केबल वायर न्यायालयात जमा करण्यात येणार ( वाचा का?)

Aurangabad High Court
Aurangabad High Court

औरंगाबाद : शहरातील पथदिव्यांभोवती लटकलेल्या बेकायदेशीर २०० किलोमीटर केबल वायर औरंगाबाद खंडपीठातील न्यायालयीन प्रबंधकांकडे ११ मार्चरोजी सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी दिले आहेत. शहरातील पथदिव्यांभोवती बेकायदेशीर वायरचे जाळे काढून टाकण्याचे आदेश न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी ४ ऑक्टोबर २०१९ रोजी महापालिकेला दिले होते.

शहरातील पथदिव्यांभोवती बेकायदेशीर वायरचे जाळे पसरलेले असून त्यामुळे अपघात, जीविताला धोका पोहोचत असल्याने त्यावर कारवाई करावी, अशा विनंती करणारी याचिका मुकेश राजेश भट यांनी केली आहे. खंडपीठाने महापालिकेला दोन आठवड्यात त्या वायर काढून टाकण्याचे आदेश दिले होते. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्याचा अहवाल खंडपीठात सादर करा असे आदेशात नमुद केले होते. शहरात ४० ते ५० हजार पथदिवे आहेत. सर्व पथदिवे पालिकेची मालमत्ता आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारीही महापालिकेचीच आहे. या पथदिव्यांभोवती खासगी केबल चालक, इंटरनेट चालकांचे वायर लटकतात. जालना, जळगाव, रेल्वेस्टेशन रोडवर अनेक ठिकाणी पथदिव्यांभोवती खासगी वायरचे जाळे लटकलेले दिसते आहे.

अशा लटकणाऱ्या वायरमध्ये अडकून २३ सप्टेंबर २०१७ रोजी महावीर चौक ते सिद्धार्थ उद्यानाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून जाताना दोघे पडले. त्यातील एकाचा गळा गंभीररीत्या चिरला गेला. अशी घटना घडण्याची शक्यता ओळखून मुकेश राजेश भट यांनी २८ सप्टेंबररोजीच महापालिकेकडे अर्ज दाखल करून लक्ष वेधले होते. सोबत काही छायाचित्रेही सादर केली होती. महापालिकेने त्या अर्जास काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून भट यांनी खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी झाली असता दोन आठवड्याच्या आत पथदिव्यांवर लटकत असलेली वायरी काढून टाकाव्यात असे आदेश दिले होते.
हेही वाचा-  बेवारस कुत्रीच्या उपचारासाठी शिक्षकांचा पुढाकाराने रूग्णवाहिका आली धावून 

...तर शपथपत्र खोटे समजण्यात येईल

खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेने शहरात बेकायदेशीर केबल वायर काढण्याची मोहीम घेण्यात आल्याचे शपथपत्र महापालिकेचे विद्यूत विभागचे प्रमुख अविनाश देशमुख यांनी ४ मार्च रोजी दाखल केले. जवळपास २०० किलोमीटर वायर जप्त करण्यात आल्याची माहिती शपथपत्रात देण्यात आली. जप्त करण्यात आलेली २०० किलोमीटर वायर औरंगाबाद खंडपीठात न्यायालयीन प्रबंधक यांच्याकडे ११ मार्च रोजी सादर करण्याचे आदेश खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत. खंडपीठाच्या आदेशानुसार केबल वायर जप्त केल्या नसतील तर अविनाश देशमुख यांचे शपथपत्र खोटे समजण्यात येईल. त्यानंतर प्रतिवादींवर कारवाई करण्यात येईल असे खंडपीठाने बजावले आहे. याचिकाकर्त्यांची बाजू सचिन हांगे हे मांडत आहेत. महापालिकेतर्फे ॲड. अंजली दुबे बाजपेयी मांडत आहेत. या याचिकेची सुनावणी १२ मार्च रोजी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com