आनंदराज आंबेडकर यांनी का निवडला वेगळा रस्ता?

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : अगोदर लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला अपयश आले. त्यात आम्ही आता वंचित आघाडीसोबत फारकत घेत घेतली आहे. आम्ही आता स्वतंत्र पायावर उभे राहत आहे. असे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत सांगितले. 

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. वंचितच्या अपयशाने आंबेडकरी चळवळीत निराशा आहे. त्यामुळे आनंदराज यांनी पुन्हा वेगळी वाट निवडली असून आगामी सर्व निवडणुका ते स्वतंत्र लढणार आहेत.

आगामी निवडणुकीसाठी त्यांनी तयारी करत राज्यभरातील कार्यकर्त्यांना औरंगाबादच्या मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात बोलावले होते. दिवसभर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पुन्हा एकदा राज्याची नवीन कार्यकारणी निवडली आहे. या कार्यकारणीच्या माध्यमातून राज्याभर रिपब्लिकन सेनेची बांधणी केली जाणार आहे.

भविष्यात निवडणुकीत कुणासोबत जायचे?

आता निवडणुकीसाठी आम्ही स्वतंत्रपणे आमच्या पायावर उभे राहत आहोत. भविष्यात निवडणुकीत कुणासोबत जायचे का, याचा त्यावेळची परिस्थिती बघून विचार केला जाईल. सध्या अनेक जण आमच्या पक्षात येत आहे. आज सुद्धा अनेक जण आले आहेत असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एमआयएमसोबत आघाडी करुन औरंगाबाद शहरात राज्यातील पहिली सभा घेतली होती त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. 

मात्र एमआयएमने औरंगाबादची जागा जिंकली. तर विधानसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमने स्वतंत्रपणे निवडणूक लढली. यातसुद्धा वंचित आघाडीला अपयश आले. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. तर एमआयएमने मालेगाव मध्य, धुळे शहर अशा दोन जागा जिंकल्या. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीने लक्षणीय मते मिळविली असली, तरी त्याचे रुपांतर त्यांना विजयी गणितात करता आले नाही. त्यामुळे आता रिपब्लिकन सेनेने वेगळी वाट निवडली आहे.

सीएए, एनआरसीला विरोध

"आमचा सीएए, एनआरसीला कडाडून विरोध आहे. रामजन्मभूमीचा मुद्दा संपल्याने भाजकडून सीएए, एनआरसीचा मुद्दा आणला जात आहे. भाजपकडून सध्या धर्मा-धर्मावरून भेदाचे राजकारण केले जात आहे,'' अशी टीका त्यांनी केली. 

आंबेडकर म्हणाले, "रामजन्मभूमीचा मुद्दा संपल्याने भाजपकडून सीएए, एनआरसी पुढे केली जात आहे; मात्र आम्ही अन्न, वस्त्र, निवारा याकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहोत. यांना कोणते रजिस्टर आणायचे असेल तर त्यांनी बेरोजगारांचे रजिस्टर आणावे. यातून किती बेरोजगार आहे, त्यांची वेगळी माहिती मिळेल; मात्र हे सर्व सोडून केंद्राकडून भेदाभेदाचे राजकारण सुरू आहे. सीएए आणण्याची काय गरज होती का? पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेल्या 34 हजार लोकांना अगोदरच नागरिकत्व देण्यात आले आहे; मात्र एका धर्माला वगळून त्यांना इतरांना मेसेज पाठवायचा आहे. यातून राजकीय उद्देश साध्य करणे अतिशय दुर्दैवी आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन समता, बंधुत्व, संविधानावर चालले पाहिजे,'' असे आवाहनही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com