अबब..! मालमत्ताधारकांकडे थकले तब्बल ३८५ कोटी 

Aurangabad mahapalika.jpg
Aurangabad mahapalika.jpg

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महापालिकेला सुमारे १०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यात मालमत्ता कराची वसुली ठप्प झाली आहे. दरम्यान गेल्या महिनाभरापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रशासनाने थकीत मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे.

ज्या मालमत्ताधारकाकडे एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे, त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या यादीत १० हजार २२६ जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडे तब्बल ३८५ कोटी रुपये थकीत असल्याचे समोर आले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे दोन हजार व्यावसायिक मालमत्तांधारकांकडून कर वसुल करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे कर निर्धारक व संकलक नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  
महापालिकेच्या तिजोरीत कांही वर्षांपासून खडखडाट आहे. कंत्राटदारांची देणी सुमारे अडिचशे कोटींच्या घरात गेली आहे. जास्तीत जास्त मालमत्ता कर वसुल करून ही देणी देण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र कोरोनामुळे महापालिकेच्या नियोजनावर पाणी फेरले गेले आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडानमुळे गेल्या पाच महिन्यात मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना, प्राणिसंग्रहालय यासह इतर विभागांचे सुमारे १०० कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान झाले आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग सुरूच असला तरी आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी शासनाने गेल्या महिन्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने थकीत मालमत्ता कराच्या वसुलीचे मनावर घेतले आहे. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार एक लाखपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांच्या यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत १० हजार २२६ जणांचा समावेश आहे. तर सुमारे दोन हजार मालमत्ता या व्यावसायिक असल्याचे श्री. भोंबे यांनी सांगितले. वसुलीसंदर्भात प्रशासक श्री. पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्यासह वॉर्ड अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक मालमत्तांच्या थकीत कराच्या वसूलीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे भोंबे यांनी सांगितले. 

वादग्रस्त प्रकरणांमुळे वाढली थकबाकी 
दहा लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडे ३८५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील अनेक प्रकरणे वादग्रस्त असून, डबल कर लागणे, मालमत्तेची मालकी बदलली तरी जुन्याच मालकाच्या नावाने कर आकारणी, दोन मालकांमधील वाद अशा अनेक कारणांमुळे थकबाकी वाढत गेल्याचे भोंबे यांनी स्पष्ट केले. 

प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटून दिल्या मालमत्ता 
वॉर्ड कार्यालयस्तरावर वसुलीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला मालमत्ता वाटून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात सरासरी २० ते २५ एवढे वसुली कर्मचारी असून, यातील ८० टक्के कर्मचारी कंत्राटी स्वरूपाचे आहेत. त्यांच्याकडून बॉण्ड घेऊन जबाबदारी निश्चित केली जात आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे सरासरी दोन हजार मालमत्तांची जबाबदारी येईल, असे भोंबे यांनी सांगितले.

Edited By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com