औरंगाबाद : कोरोना संसर्गाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने नव्याने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुकानात एका वेळी फक्त पाच जणांना प्रवेश देण्यात यावा. प्रत्येक ग्राहकाची ऑक्सिमिटरच्या माध्यमातून ऑक्सिजन लेव्हल व थर्मलगनने तपासणी व्हावी, असे आदेश शहरातील व्यापाऱ्यांना देण्यात आले असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी मंगळवारी (ता. २३) सांगितले.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा दोनशेपार झाली आहे. वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात डॉ. पाडळकर यांनी सांगितले, की संसर्ग रोखण्यासाठी यापूर्वीच्याच नियमावलीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले पण त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी संसर्ग झपाट्याने वाढला. शहराच्या प्रत्येक भागात रुग्ण आढळून येत होते.
त्यानंतर महापालिकेने प्रत्येक दुकानदारांसाठी नियमावली तयार केली होती. ग्राहकाची नोंदणी करण्यासोबतच ऑक्सिमिटरने ऑक्सिजन लेव्हलची तपासणी करणे, थर्मलगनच्या माध्यमातून ताप तपासणी करणे. यात कोणी संशयास्पद आढळून आल्यास महापालिकेला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही नियमावली नव्याने लागू करण्यात आली असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
१६ लाख लोकसंख्या अन् ५० कर्मचारी
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. शहराची लोकसंख्या १६ लाख एवढी मानली जाते मात्र महापालिकेच्या नागरिक मित्र पथकात फक्त ५० कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रत्येकावर लक्ष ठेवणे अवघड आहे. नागरिकच स्वयंशिस्तीतून कोरोना संसर्ग रोखू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.
Edited - Ganesh Pitekar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.