औरंगाबाद : कोरोनामुळे तोट्यात गेलेली शहर बस वाहतुक सेवा अजुनही फायद्यामध्ये आलेली नाही. तथापि शहरवासियांची सोय व्हावी यासाठी ९० पैकी सध्या ३० शहर बसेस रस्त्यावर धावत आहेत. नवीन वर्षात यात आणखी २० शहर बसेस रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे स्मार्ट सिटीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
स्मार्ट सिटीअंतर्गत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने १०० बसेस खरेदी केल्या असून यापैकी ९० बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र मार्च मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे ही बससेवा बंद करण्यात आली. गेल्या सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे निदर्शनास आल्याने ५ नोव्हेंबरपासून पुन्हा शहर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने प्रमुख मार्गांवर केवळ ३० बस सुरू केल्या. मात्र, दोन महिने झाले तरी या बसमध्ये प्रवासी संख्या अत्यल्प आहे. परिणामी सध्या धावत असलेल्या शहर बसेसचा प्रति किलो मीटरचा तोटा ४५ रुपयांवर पोहचला आहे.
यामुळे स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने उर्वरित बस सुरू केलेल्या नाहीत. आता नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून आणखी २० बस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षात या बसेसचा प्रतिसाद पाहूनच पुढील टप्प्यातील ४० बसेस सुरू करण्याचे नियोजन केले जाणार आहे.
स्मार्ट सिटी बसचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी सांगितले, सिटी बसचा प्रति किलोमिटरचा खर्च हा ६५ रुपये इतका आहे. त्या तुलनेत सध्या सिटी बसला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या धावणाऱ्या बसचे प्रति किलो मीटरचे उत्पन्न हे अवघे २० रुपये इतके आहे. त्यामुळे एका किलो मीटरमागे सध्या ४५ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तरच हा तोटा कमी होऊ शकेल आणि सेवा अधिक काळ सुरू राहील.
Edited - Ganesh Pitekar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.