शिर्डी किती दूर म्हणत दुचाकीवर घातल्या गोळ्या 

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : नगर जिल्ह्यातील वाडे गव्हाणचे उपसरपंच प्रकाश भाऊसाहेब कांडेकर (वय ३८) यांची राजकीय वैमनस्यातून गोळी घालून हत्या करण्यात आली होती. प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपेची तर एका आरोपीला तीन वर्षे शिक्षा सुनावली होती.

या निर्णयाला आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले असता, खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्या पीठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. तर एकाची निर्दोष मुक्तता केली. 

वाडे गव्हाणच्या उपसरपंचांचा गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून झाला. पोलिसांच्या हाती ठोस पुरावे नव्हते; केवळ संशयावरून पोलिस आरोपीपर्यंत पोचले व राजकीय वादातूनच खून झाल्याचा उलगडा झाला. प्रकाश कांडेकर १३ नोव्हेंबर २०१० रोजी शिरूर (जि. पुणे) येथे गेले होते. तेथून ते सायंकाळी किसन आबाजी शेळके यांच्यासह दुचाकीवरून घरी परतत होते.

वाडेगव्हाण शिवारात एका हॉटेलसमोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना ‘शिर्डी किती लांब आहे,' असे विचारले. त्याचवेळी कांडेकर यांच्यावर दुचाकीवरील तरुणाने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. कांडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. किसन शेळके यांच्या फिर्यादीवरून सुपे पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून राजाराम शेळके व राहुल शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

हे आहेत पाच आरोपी 

तपासात निष्पन्न झाल्यानुसार राजाराम ऊर्फ जयवंत शेळके, मुलगा राहुल शेळके (दोघेही वाडेगव्हाण), अमित नायर (पुणे), जवान राजेंद्र भोर (भोरवाडी) गोविंदसिंग यादव (उत्तरप्रदेश), यांना भादंवि कलम ३०२,१२०(ब), भारतीय हत्यार कायद्यातील तरतुदीनुसार दोषी ठरविण्यात आले होते. राजाराम शेळके व राहुल शेळके यांनी कांडेकरला ठार मारण्यासाठी भोर याला सुपारी दिली होती.

भोर याने गोविंदसिंह यादवमार्फत रिव्हॉल्व्हर आणली होती. त्यानंतर कांडेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सत्र न्यायालयात १४ आरोपींविरोधात खटला चालला, त्यातील आठ जणांना निर्दोष सोडण्यात आले.

सरकारी पक्षातर्फे ४१ तर बचाव पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. खंडपीठाने पाच जणांची जन्मठेप कायम ठेवत एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली. खंडपीठात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता राजेंद्र सानप यांनी बाजू मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com