औरंगाबाद : कोरोनाचे नुसते नाव जरी ऊच्चारले तरी भल्या भल्यांना घाम फुटतो. असाच एक किस्सा पैठण रोडवरील संताजी पोलीस चौकी येथे कोरोनाची अँटीजेन चाचणी करणाऱ्या महापालिकेच्या पथकालाही आला. पैठणहुन नुकतेच लग्न होऊन आपल्या गावाकडे निघालेल्या नव वधू-वर तसेच सर्व वऱ्हाडी मंडळींना कोरोना अँटीजेन चाचणी करण्यासाठी थांबविले असता त्यांनी अगोदरच चाचणीची गरज काय?
आम्हाला कुठे कोरोनाची लागण झाली अशी उडवा उडवी करून चाचणी न करण्याचे बहाणे शोधले. परंतु चेक पोस्ट प्रमुख सागर सोनवणे यांनी वधु-वरासह वर्हाडी मंडळींचे मन वळविले आणि त्यांना चाचणी करण्यास भाग पाडले. अँटीजेन चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत सर्वांच्याच जीवाची घालमेल सुरु होती. परंतु एकदाचा सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
अधिक माहिती अशी कि, पैठण येथून नुकतेच लग्न झालेलं एक विवाहीत जोडपे आणि सोबतचे वर्हाडी मंडळी असे एकूण ९ जण मंगळवारी (ता. ११) विवाह होऊन सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास आपल्या घरी निघाले होते. याच दरम्यान कांचनवाडी येथील संताजी चौक येथे महानगरपालिकेच्या अँटीजेन चाचणी करणाऱ्या पथकाने त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला हात दाखवून थांबविले.
त्या गाडीमध्ये नवविवाहीत जोडपे (वधु-वर) तसेच अन्य सहा वऱ्हाडी मंडळी व एक ड्रायव्हर असे एकूण नऊ लोक प्रवास करत होते. त्यांना थांबवून त्यांची कोरोना अँटीजेन चाचणी करावी लागेल असे त्यांना सांगण्यात आले. सुरुवातीला वधूवरांसह अन्य वऱ्हाडी मंडळीनी शंका-कुशंका उपस्थित केल्या व प्रतिसाद दिला नाही. परंतु संताजी चौक येथील महानगरपालिका चेक पोस्ट प्रमुख सागर सोनवणे यांनी त्यांची समजूत घातली ही चाचणी करणे बंधनकारक असल्याचे तसेच तुमच्या व इतरांच्याही आरोग्याच्या दृष्टीने कसे फायदेशीर आहे आदी बाबी त्यांच्या लक्षात आणून दिल्या.
तेंव्हा कुठे सर्वजण ॲंटीजेन चाचणी करण्यास तयार झाले. चाचणी केल्यानंतर आपले रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील कि निगेटिव्ह हे समजेपर्यंत मात्र वधू-वरांसह सर्वच वराडी मंडळींचे धाबे दणाणले होते. मात्र चेक पोस्ट प्रमुख सागर सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना धीर दिला व थोडा वेळ शांत बसायला सांगितले. तोपर्यंत सर्वांचाच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितल्याने वधू-वरासह सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि सर्वांनी सुटकेचा निस्वास सोडला.
नंतर चेक पोस्ट वरील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी नव विवाहित दाम्पत्याला पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्या देऊन पुढे त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली. विधी सल्लागार तथा महापलिका टास्क फोर्स प्रमुख ऍड.अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक श्री. पाटील तसेच चेक पोस्ट प्रमुख सागर सोनवणे, हरिभाऊ घोडके तसेच वैभव आभोदकर आणि उपस्थित अन्य अधिकारी कर्मचारी यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला व अँटीजेन चाचणी मोहीम फत्ते केली.
Edit-Pratap Awachar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.