औरंगाबाद - पंजाबमधील फिरोजपूर येथे तैनात असताना पती शहीद झाले. त्यावेळी अवघे दहा वर्षे वय असलेला मुलगा एकमेव आधार. मात्र खचून न जाता जीवनात प्रत्येक संकटावर मात करत उभे राहण्याचा निर्धार केलेल्या वीर पत्नी अर्चना बंडू मोरे यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यात अपयश आले; पण शेवटी त्या सैनिक सहायता केंद्रात लिपिक झाल्या.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील बंडू मोरे हे महार रेजिमेंटमध्ये फिरोजपूर येथे कार्यरत असताना पाच सप्टेंबर 2006 ला शहीद झाले व मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बंडू यांच्या पत्नी अर्चना यांचे आयुष्य तर अंधकारमय झाले. मात्र त्यावेळी अवघे दहा वर्षे वय असलेल्या आपल्या मुलासाठी दुःखातून सावरून संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी केला. 'तूच आमच्यासाठी सर्वस्व आहेस' अशा शब्दांत धीर देत कुटुंबानेही आधार दिला; पण जीवनातील संघर्ष कमी नव्हता. कारण शिक्षण फक्त दहावीपर्यंत झालेले. एवढ्या कमी शिक्षणावर नोकरी कुठे मिळणार? शहरात जाऊन एकटे कसे राहायचे? एकटी महिला म्हणून कोणी घरही भाड्याने देईना. पण शेवटी एक वीर पत्नी आहे, हाच अर्चना यांच्यासाठी सन्मान ठरला. अर्चना यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करीत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली; मात्र स्पर्धा परीक्षेत त्यांना यश आले नाही. महार रेजिंग डेमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले. यावेळी वरिष्ठांना कल्पना दिली. त्यांनी बटालियन सदैव तुमच्या सोबत आहे, अशा शब्दांत आधार दिला. त्यानंतर अर्चना यांच्या नोकरीसाठी प्रयत्न झाले व सैनिक सहायता केंद्र येथे लिपिक म्हणून
त्यांना नोकरी मिळाली.
मुलाने करावी देशसेवा
अर्चना मोरे यांनी सांगितले, की भारतीय सैनिकांच्या पत्नींनी हिम्मत दाखवत मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे. माझ्या मुलाने देखील देशासाठी काहीतरी करून आपल्या वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, हाच माझा निर्धार आहे. वीर पत्नीला सैनिकांनी बहिणीप्रमाणे सन्मान द्यावा.
हेही वाचा -
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.