औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (ता.१७) नवी दिल्लीतील रेल्वे भवन येथे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विजय यादव यांची भेट घेतली आणि अनेक प्रलंबित प्रकल्पांच्या पायाभूत सुविधा, संपर्क आणि विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. शिवाजीनगर येथील ओव्हरब्रिजला आठवडाभरात मंजुरी देण्याचे आश्वासन यावेळी श्री. यादव यांनी दिले. त्यामुळे सातारा देवळाईकरांचा जिव्हाळ्यांचा प्रश्न असलेला शिवाजीनगर ओव्हरब्रिजची मागणी लवकरच मार्गी लागणार आहे.
शिवाजीनगर येथे रेल्वे ओव्हरब्रिजची प्रलंबित मागणीकडे खासदार इम्तियाज जलील यांनी लक्ष वेधले. यासाठीचे सर्वेक्षण महाराष्ट्र सरकारने संयुक्तपणे केले असून रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याला आठवड्याभरातच त्यासाठी मंजुरी देण्यात येईल, त्यानंतर निविदा प्रक्रिया पार पाडली जाईल असे आश्वासन श्री. यादव यांनी दिले. त्याचप्रमाणे परभणी ते मनमाडदरम्यान रेल्वेरुळांच्या दुपदरीकरण करण्याच्या कामास वेग देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या विकास व सुशोभीकरणबाबतही चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
औरंगाबाद रेल्वेस्थानकावरील पीट लाईनच्या संदर्भात कामाला चालना देण्याची गरज असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी निदर्शनास आणून दिले, त्यावर रेल्वे अधिकाऱ्यांना लवकरात लवकर यासाठी फिजिब्लिटी अहवाल सादर करण्यास सांगितले जाईल, असे आश्वासन श्री. यादव यांनी दिले.
औरंगाबाद-मुंबई-नागपूर हायस्पीड ट्रेन प्रकल्पातून औरंगाबादला वगळण्यात आलेले नसल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की पर्यटन आणि उद्योगांचे एक प्रमुख केंद्र म्हणून औरंगाबादचे महत्त्व रेल्वेला माहीत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने यावर्षी नवीन प्रस्ताव घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
(संपादन-प्रताप अवचार)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.