नांदेड - नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी दररोज सकाळी तपोवन, सायंकाळी नंदीग्राम आणि देवगिरी अशा तीन एक्सप्रेस रेल्वेगाड्या आहेत. रात्रीच्या वेळी मुंबईला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे सुरु करावी, अशी नांदेडकरांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. त्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे निवेदन देण्यासोबतच आंदोलनही करण्यात आले होते. अखेर या मागणीची दखल घेतल्यामुळे व अनेक वर्षांची मागणी मंजूर झाल्याने नांदेडकरांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
मनमाडहून मुंबईला जाणारी राज्यराणी एक्सप्रेस ही नांदेडपर्यंत करावी, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यापासून होती. त्यासाठी निवेदने देऊन मागणीही करण्यात आली होती. त्यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाठपुरावाही केला होता. त्यामुळे आता मनमाड ऐवजी नांदेडहून ही रेल्वे सोडण्यास केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मंजुरी दिल्याची माहिती खासदार चिखलीकर यांनी दिली. या मागणीची दखल घेत लवकरच नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी रात्रीच्या वेळी रेल्वेगाडी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
हेही वाचा....कंधारच्या नगराध्यक्षांना पदावरून हटवा
अनेक प्रश्न लागतील मार्गी
नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले असल्याची माहिती खासदार चिखलीकर यांनी दिली. ते म्हणाले की, मागील पंधरा वर्षांपासून नांदेडवरून मुंबईला रात्री जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करावी, अशी नांदेडकरांची मागणी होती. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे ता. १७ जुलै रोजी या बाबत पत्रव्यवहार केला होता. रेल्वेमंत्र्यांनी त्या संदर्भात सोमवारी (ता. १६) पत्र पाठवून मागणी मंजूर झाल्याचे कळविले असल्याची माहिती चिखलीकर यांनी दिली.
अशी राहणार रेल्वे
मनमाडवरून मुंबईला जाणारी गाडी (क्रमांक २२१०१) ही राज्यराणी एक्सप्रेस आता नांदेडवरून सुटणार आहे. सोळा डब्यांच्या या गाडीला नांदेडसाठी दहा डबे, तर मनमाडसाठी सहा डबे आरक्षित राहणार आहेत. ही गाडी नांदेडवरून रात्री नऊ वाजता निघून मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पोचेल, तर मुंबई येथून गाडी (क्रमांक २२१०२) संध्याकाळी सात वाजता निघून नांदेडला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पोहचेल, अशी माहिती खासदार चिखलीकर यांनी दिली.
हेही वाचा....नांदेडमधील अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली
नरेंद्र मोदी यांची मागितली वेळ
या सोबतच नांदेड - बिदर रेल्वेमार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. निझामाबादवरून तिरुपतीला जाणारी रॉयल सीमा एक्सप्रेस नांदेडवरून सोडण्याची मागणी सभागृहात केली आहे. यामुळे ही गाडी लवकरच नांदेडवरून धावणार आहे. नांदेडकरांची मागील पंधरा वर्षांची मागणी केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पूर्ण केल्यामुळे रेल्वेमंत्र्यांचे नांदेडकरांच्या वतीने आभार.
- प्रताप पाटील चिखलीकर, खासदार, नांदेड.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.