औरंगाबाद : कोरोना टेस्ट न करता व्यापार केला तर थेट एफआयआर...लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस 

corona virus image.jpg
corona virus image.jpg

औरंगाबाद : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शहरात नऊ दिवसांचा लागू केलेला लॉकडाऊन शनिवारी (ता. १८) संपणार आहे. त्यामुळे रविवारपासून (ता. १९) पुन्हा बाजारपेठा, किराणा दुकानांसह सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःला घरात बंदीस्त करून घेतले मात्र कोरोनाची साखळी तुटलीच नाही. लॉकडाऊनच्या काळात रोज अडीचशे ते तीनशेच्या दरम्यान बाधित रुग्ण आढळून आले. कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्ण समोर येत असल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने शुक्रवारपासून (ता.१०) ते शनिवार (ता.१८) पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला गेल्या आठ दिवसात नागरिकांनी प्रतिसादही दिला. त्यामुळे याकाळात रुग्णांची संख्या कमी होणे अपेक्षीत होते. पण रोज रुग्णांचे आकडे वाढतच आहेत. त्यात बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. तसेच रोज सरासरी दोन ते अडीच हजार ॲन्टीजेन व आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे देखील रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. दरम्यान नऊ दिवसांच्या लॉकडाऊनचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रविवारपासून बाजारपेठा उघडताच गर्दी होण्याची शक्यता आहे. एकाच दिवसी बाजारपेठेत गर्दी होऊ नये, यासाठी काय निर्णय घ्यायची याची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. 

टेस्ट न करता व्यापार केला तर थेट एफआयआर 
व्यवहार सुरु करण्यापूर्वी व्यापारी, भाजी व फळ विक्रेते यांना अँटीजेन टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. ही टेस्ट न करता कुणी व्यापार सुरु केला तर त्याच्यावर एफआयआर दाखल केला जाईल असा इशारा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिला. याबद्दल व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व भाजी विक्रेता संघाचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. दोन्हीही संघटनांनी सहमती दाखवली आहे. महापालिका अँटीजेन टेस्टचे कीट उपलब्ध करून देईल,

त्याशिवाय आरोग्य विभागाचा स्टाफ देखील उपलब्ध करून देईल. व्यापारी महासंघ व भाजी फळे विक्रेत्या संघाने त्यांच्या सदस्यांना आणून टेस्ट करून घ्यायची आहे. टेस्टसाठी शहरात तेरा ते पंधरा ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. त्याच्या नियोजनाची जबाबदारी महापालिकेच्या टास्क फोर्सच्या प्रमुख अपर्णा थेटे, पुष्कल शिवम आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्यावर देण्यात आली आहे असे श्री. पांडेय यांनी सांगितले. 

चारशे जणांची टीम 
कोरोना चाचणी केल्याशिवाय कुणी दुकान सुरु केले तर त्याच्यावर एफआयआर दाखल केला जाईल. चाचणी निगेटिव्ह आल्याचे पत्र आहे का हे तपासण्यासाठी ४०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी टेस्ट निगेटिव्ह आल्याचे पत्र तपासतील. पत्र नसेल तर कारवाई केली जाईल. शनिवारी दुपारी दोन वाजेपासून या टेस्ट सुरु केल्या जाणार असून, त्या सोमवारपर्यंत (ता.२०) पूर्ण होतील. दुकानदाराकडे प्रमाणपत्र असेल तरच तिथे खरेदी करावी, असे पांडेय म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com