काम घेऊन आले अन् तिघे निघाले कोरोना पॉझिटिव्ह, ॲन्टीजेन चाचणीशिवाय चार कार्यालयांत 'नो एन्ट्री'

Aurangabad Latest News
Aurangabad Latest News

औरंगाबाद : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून, आता महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्तालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आता ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. बुधवारपासून (ता. २४) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून, दिवसभरात तीन जण पॉझिटिव्ह निघाले. दोन रुग्ण विभागीय आयुक्त कार्यालयात तर एक रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयात आढळून आला, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.


शहरात गेल्या सहा दिवसात सुमारे ८०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी जिल्ह्यात तब्बल २४० रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांवर अधिकचे निर्बंध घातले जात आहेत. मंगळवारी (ता. २३) जिल्हाधिकारी सुनील चौधरी, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी बैठक घेत आठ मार्चपर्यंत रात्री ११ ते सकाळी सहा वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांसाठी जुनी नियमावली लागू केली. एकाच वेळी दुकानामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देऊ नये, थर्मलगन, ऑक्सीमिटरव्दारे ग्राहकाची तपासणी करावी असे आदेश काढले.

त्याच बरोबर आता सरकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची ॲन्टीजेन पद्धतीची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी महापालिकेचे पथक तैनात करण्यात आले आहे. चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह असेल तरच कार्यालयात प्रवेश दिला जाईल. पॉझिटिव्ह आढळून आल्यास तातडीने महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये संबंधिताला दाखल केले जाणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.


बुधवारपासूनच अंमलबजावणी सुरू
बुधवारपासूनच या चारही कार्यालयात या चारही कार्यालयात तपासणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी २२८ नागरिकांची ॲन्टीजेन पद्धतीने चाचणी करण्यात आली. विभागीय आयुक्तालयात १०० जणांची चाचणी केली असता, दोघे पॉझिटिव्ह निघाले. जिल्हाधिकारी कार्यालयात ३९ जणांची चाचणी केली असता, एक जण पॉझिटिव्ह निघाला. पोलीस आयुक्तालयात २० जणांची तर महापालिकेत ६९ जणांची चाचणी करण्यात आली.

औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनेकांनी ठोकली धूम
या चारही कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्यांची मोठी संख्या असते. त्यातून संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी चारही कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर तपासणी सुरू होताच अनेकांनी कार्यालयात न येता माघारी फिरणेच पसंत केले.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com