छत्रपती संभाजीनगर - लाडक्या गणरायाला गुरुवारी (ता. २८) गणेश भक्तांना निरोप द्यावा लागणार असून, त्यासाठी विसर्जन विहिरींवर मोठी गर्दी होते. म्हणून महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. विसर्जन विहिरीतील गाळ काढण्यासह मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्क, चार ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करणे, अशी कामे अंतिम टप्प्यात आहे. या सर्व कामांवर सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
शहरात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. सजीव, निर्जीव देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत असून, गुरुवारी अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप दिला जाणार आहे. त्यानुसार महापालिकेने गणेश विसर्जनाची तयारी सुरू केली आहे.
या संदर्भात अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी सांगितले, की गणेश विसर्जन विहिरींतील गाळ काढून स्वच्छता केली जात आहे. बारा विहिरींच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. त्यासोबत हर्सूल, गारखेडा, ज्योतीनगर, देवळाई या भागात हे कृत्रिम तलाव तयार केले जात आहे. या तलावात लहान गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. गणेश विसर्जनासाठी घराघरांतून आणण्यात येणाऱ्या मूर्तींचे संकलन करण्यासाठी ३८ ठिकाणी केले जाणार असून, त्यानुसार महापालिका केंद्र सुरू करत आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक मार्गासह प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पॅचवर्क केले जात आहे. पॅचवर्कच्या कामासाठी प्रत्येक प्रभाग कार्यालयांना प्रत्येकी १५ लाख रुपये वर्षभरासाठी देण्यात आले आहेत. त्यातूनच हे काम होत आहे. विहिरींच्या स्वच्छतेसाठी ४५ लाख रुपयांची तरतूद केली असून, कृत्रिम तलाव आणि मुर्ती संकलन केंद्रावर साधारणपणे ९० लाखाचा खर्च अपेक्षित आहे, असे रणजित पाटील यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.