औरंगाबाद : ऐकावे ते नवलंच..सरकारी नोकरी असो वा खासगी नोकरी. प्रत्येकाला सध्या कार्यरत असलेल्या पदापेक्षा वरच्या पदावर आपली वर्णी लागावी, पदोन्नती मिळावी अशी अपेक्षा असते. किंबहुना अनेकजण तशी धडपडही करतात. परंतु औरंगाबाद जिल्हा परिषदेतील काही गुरुजींनी मात्र नकोरे बाबा ती पदोन्नती म्हणत जिल्हा परिषद प्रशासनाचे दरवाजे ठोठावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील तीन वर्षांपासून पदावनती करावी म्हणून गुरुजींनी शिक्षणाधिकार्यांकडे प्रस्ताव दाखल केले होते. त्यावर लवकरच कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध शाळेवर सध्या कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक तसेच पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदावनत होण्याची मागणी मान्य केली जाणार आहे. तसा ठरावच शुक्रवारी (ता.३१) शिक्षण समितीने बैठकीत घेतला आहे. गेल्या तीन वर्षापासून अनेक गुरुजींनी लावून धरलेल्या मागणीला अखेर यश आले आहे.
का केली असेल गुरुजींनी पदावनती करण्याची मागणी ?
मागील आठ-दहा वर्षांपूर्वी गुरुजीचे मुख्याध्यापक तसेच पदवीधर प्राथमिक शिक्षकपदी पदोन्नती स्वीकारलेल्या मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांना करावी लागणारी सततची ऑनलाइन टपाल कामे, तंत्र शिक्षणाचा अभाव असल्याने होणारी अडचण, यामुळे कोंडमारा सहन करावा लागत आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील कमी असलेली शिक्षकांची संख्या, काही ठिकाणी गावकऱ्यांचे शिक्षकांना असहकार्य असल्याने त्या ठिकाणी नोकरी करतांना शिक्षकांची कोंडी होत असल्याचा दावा केला जात आहे.
शालेय पोषण आहाराबाबतची कामगिरी चोख बजावण्याच्या वरिष्ठांचा दबाव आदी कारणांमुळे मुख्याध्यापकांना काम करणे कठीण जात असल्याच्याही तक्रारी आहेत. अनेक शिक्षकांना उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारही जडले आहेत. त्यामुळेच या जाचातून मुक्तता मिळावी यासाठी अनेक शिक्षकांनी मुख्याध्याक, पदवीधर शिक्षक पदावरून पदावनत करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे विनंती केली होती. काही शिक्षक संघटनांचा देखील गेल्या तीन वर्षापासून याबाबत पाठपुरावा सुरुच ठेवला होता.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
शिक्षण सभापतीच्या बैठकीत झाला निर्णय
शुक्रवारी (ता.३१) जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गुरुजींच्या मागणीला हिरवा झेंडा दर्शविण्यात आला. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी प्राप्त प्रस्तावावर लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल असे या बैठकीत सांगितले. तसेच नवीन मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि इतर पदांच्या पदोन्नती संदर्भातही तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासनही जैस्वाल यांनी यावेळी दिले .या निर्णयाचे प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख तथा जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य मधुकरराव वालतुरे ,राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जालिंदर चव्हाण ,बळीराम भुमरे आदिनी स्वागत केले आहे.
ग्रामीण भागातील शाळा टिकण्यासाठी प्रशासनाने धोरणात्मक निर्णय लवकर घ्यावा. यामुळे ऑनलाईनचे नॉलेज असलेले तंत्रस्नेही मुख्याध्यापक मिळतील. शासनास अपेक्षित असलेली आनंदायी शिक्षणाची प्रक्रिया पार पाडण्यास मदतही होईल. तसेच वयस्क मुख्याध्यापकांनी पदोन्नती नाकारल्याने शासना वरील वेतनाचा आर्थिक भारही कमी होईल.
कैलास गायकवाड, जिल्हा सरचिटणीस, प्राथमिक शिक्षक संघ
Edited BY Pratap Awachar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.