औरंगाबाद : महिला बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा (Malnutrition In Children) शोध घेतला जात असतो. जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी अतितीव्र कुपोषित-मध्यम कुपोषित (सॅम-मॅम) बालकांसाठी विशेष धडक शोध मोहिमेला १७ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. यात मोहिमेतून आठवड्याभरात ७२८ तीव्र कुपोषित बालके आढळले आहेत. जिल्ह्याअंतर्गत (Aurangabad) ४११ पथके बनविण्यात आले असून सदर पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी (Anganwadi) ताई, आशा कार्यकर्ती आणि एएनएम, मदतनीस आदींचा सहभाग असून दहा दिवसीय मोहीम राबविण्यात येत आहे.
बालमृत्यू रोखण्यासाठी मोहीम
आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार ७६४ अंगणवाडी केंद्रात १ लाख १४ हजार ५९० बालांचे वजन व उंची घेण्यात आली आहे. यामध्ये ७२८ बालके हे अतितीव्र कुपोषित तर ३ हजार ९८२ मध्यम कुपोषित आढळली आहेत. कोरोना विषाणू संसर्ग व तिसरी लाटीचा धोका पाहता या शोध मोहिमेमुळे कुपोषित बालकांची संख्या जास्त दिसत असली तरी बालकांवर उपचार करण्यासाठी आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ही मोहीम चांगली आहे. यातून कुपोषणाची खरी आकडेवारी समोर येत आहे.
एक हजार ७०९ अंगणवाडी केंद्रांचे सर्वेक्षण बाकी असून जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आढळलेल्या तीव्र कुपोषित बालकांवर बालग्राम केंद्रात उपचार व पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये तीन महिने दाखल करून त्यांना पोषण आहार देण्यात येणार आहे. यात अंगणवाडी सेविका घराघरांत जाऊन बालकांची पोषण स्थिती काय आहे याची माहिती घेण्यात असून कोरोनाची तिसरी लाट पाहता जास्तीत जास्त बालकांचे सर्वेक्षण होण्याची गरज आहे.
- प्रसाद मिरकले, महिला व बालविकास अधिकारी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.