भाजपसोबत जाण्याची ‘मनसे’ची सुप्त इच्छा!
औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेच्या सत्तेतून भाजप शिवसेनेपासून वेगळा झाला. राज्यातील ‘महाविकास आघाडी’मुळे शिवसेनेसोबत जायला राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे, त्याचप्रमाणे भाजपसोबत हातमिळवणी करायला मनसेचे स्थानिक नेतृत्व इच्छुक आहे. याबाबतची सुप्त इच्छा मनसेचे पदाधिकारी अनेकदा खासगीत बोलून दाखवतात. मनसेनेही स्थापनेपासूनचा झेंडा बदलला आहे. तसेच भगवा हातात घेत प्रखर हिंदुत्वाचा नारा दिला आहे. हिंदुत्व हाच दोघांना जोडणारा धागा आहे. दोन्ही पक्षांच्या मिलनाची चर्चा मनसेप्रमाणे भाजपच्या गोटातही सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेच्या सगळ्याच विंगच्या कार्यकारिणी अनेकदा अंतर्गत उखाळ्या-पाखांळ्यामुळे पक्ष नेतृत्वाला बरखास्त कराव्या लागल्या होत्या. २०१९ नंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतरही पक्षात मोठे बदल करण्यात आले.
मनसेच्या नव्या शहर आणि जिल्हा कार्यकारिणीला जो काळ मिळाला, तो कोरोनाचाच आहे. लॉकडाऊनमध्ये अन्नदान, औषधपुरवठा, गरिबांना धान्य याप्रकारचे उपक्रम हाती घेतले. दरम्यान, शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच होती. महापालिका उपायुक्तांना याचा जाब विचारायला गेलेल्या जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना राग अनावर झाला आणि यावेळी उपायुक्तांवर खुर्ची उगारल्याचा प्रसंगही घडला. शहर नामांतर मुद्दा लावून धरताना दाशरथे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर निषेध पत्रके भिरकावली होती. वीज बीलाबाबतही आंदोलन केले. दरम्यान, मनसेने कोविडयोद्ध्या डॉक्टरांचाही सन्मान केला. मनसे पक्ष म्हणून कार्यरत राहण्यासाठी कुठेही मागे पडत नाही.
महापालिकेत आतापर्यंत राज वानखेडे यांच्या रुपाने एकमेव नगरसेवक मिळाला होता. मात्र, तेही गेल्या सहा वर्षापासून भाजपमध्ये आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये एकालाही संधी मिळाली नाही. त्यावेळी एकाच ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत एंट्री व्हावी, यासाठी प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्यांमध्ये पाच ते सहा जण आहेत. त्यासोबत भाजपची साथ मिळाल्यास किमान दहा जागा महापालिकेत आणण्याची तयारी आखली जात आहे. भाजपसोबत जाण्यासाठी स्थानिक नेतृत्वात मनसेच्या अनेकदा प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, भाजप राष्ट्रीय आणि मनसे प्रादेशिक पक्ष असल्याने याबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्वाला घेता येणार नाही. मनसेच्या अडचणीच्या वाटणाऱ्या गोष्टींवर तडजोडी झाल्यास भाजप-मनसे एकत्र लढू शकतील, असाच अंदाज बांधला जात आहे.
‘मनसे स्टाईल आंदोलना’चेही ‘अनलॉक’
प्रसिद्धीपत्रकात शेवटच्या ओळीपुरते मर्यादित झालेले ‘मनसे स्टाईल आंदोलन’ सध्या खऱ्या अर्थाने औरंगाबादेत पहायला मिळत आहे. कोरोनाकाळात गरीब कुटूंबांना अवाच्या सव्वा रुग्णालयांचा खर्च परवडत नाही, शाळेचे अवाजवी शुल्क पेलत नाही, अशा अडल्या-नडल्यांच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य मनविसेचे सैनिक करत आहेत. तोडफोडीत फेमस असलेले वैभव मिटकर यांची जागा आता राजीव जावळीकर आणि मंगेश साळवेंच्या टीमने घेतल्याचे दिसते. शाळेच्या विषयात तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दखल घेत पाठ थोपटली. दुसऱ्याला न्याय मिळवून देताना स्वत:च कायद्याच्या कचाट्यात आपले सैनिक अडकू नयेत, याच्याही टीप्स राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. याचवेळी कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्याकरवी आमदार राजू पाटील हे थेट सहकार्य करत आहेत. ‘वर्षभरापासून विद्यार्थी कार्यकारिणी बरखास्त केली मात्र, काम थांबवता येत नाही.’ अशी भुमिका मनविसेने घेतली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.