'भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरेंनी नेतृत्व केले तर देशाला मजबूत नेतृत्व मिळेल'

Sanjay Raut News Aurangabad
Sanjay Raut News Aurangabad

औरंगाबाद  : आपल्या विचारांचे नसणाऱ्यांना नष्ट करण्याचे काम केंद्रातील भाजपचे सरकार करत आहे; परंतु जेव्हा जेव्हा जनता शांत असते तेव्हा जनतेच्या आतून एक खदखद निर्माण होत असते. २०१४, २०१९ च्या निवडणुका झाल्या. आता २०२४ मध्ये जनता आपल्या मतांतून स्फोट घडवून आणेल, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

येथे रविवारी (ता.२८) जयभीम फेस्टिव्हलचे उद्‍घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. भीमशक्ती विचार मंचचे अध्यक्ष तथा जयभीम फेस्टिव्हलचे संकल्पक, माजी नगरसेवक चेतन कांबळे उपस्थित होते. उद्‍घाटनानंतर एका हॉटेलमध्ये पत्रकार राजू परुळेकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत राऊत यांनी देशाच्या व राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार व महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व केले तर देशाला एक मजबूत नेतृत्व मिळेल.

यासाठी ‘यूपीए’मध्ये फेरबदल करायची गरज आहे. देशात काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करून देशातील सर्व राज्यांतील घटक पक्षांची एक मूठ बांधली तरच भाजपला सत्तेतून बाहेर ठेवू शकू. यासाठी काँग्रेसने थोडा त्याग करण्याची तयारी ठेवावी. जगात कोणी अमरपट्टा बांधून आलेला नाही. काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनाही सत्ता सोडावी लागली, असे राऊत म्हणाले. देशातील घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य हिरावून त्यांचा राजकीय वापर करत विरोधकांना संपविण्याचा डाव सुरू आहे. याविरुद्ध सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.


दिलदार दिल्लीत आता मोगलाई
ज्या सरकारला देशात बहुमत आहे, त्या पक्षातील नेत्यांना दिल्लीत बोलण्याचे स्वतंत्र नाही. दिल्ली मूकबधिर झाली आहे. तेथील अनेक नेत्यांवर बंधने लादली आहेत. एकेकाळी दिल्ली दिलदार होती; परंतु आता तिथे मोगलाई आली आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली. त्यामागचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी हे त्याचे द्योतक आहे. राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करील, असे राऊत म्हणाले.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आंदोलनजीवी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका
वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर राऊत म्हणाले, आम्ही जनता व विरोधकांचा आवाज ऐकतो. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला आहे. विरोधकांनी सरकार घाबरले असे समजू नये. कारण हाथरस, उन्नाव येथील घटनांत किती नेत्यांचे राजीनामे भाजप सरकारने घेतले, हे आम्ही पाहिले आहे. त्यामुळे अधिवेशनादरम्यान विधिमंडळात आम्ही गोंधळ घालू म्हणणाऱ्यांनी, संसद चालू दिली पाहिजे असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांचा आदर्श घेत काम करावे. नाहीतर त्यांच्यावर ‘आंदोलनजीवी’ म्हणण्याची वेळ येईल, असा टोला राऊन यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.
 

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com