वादळी वाऱ्याचा सात तास धुमाकूळ, तीन हजार हेक्टरवरील रब्बीची पिके आडवी

Aurangabad news
Aurangabad news

सोयगाव (औरंगाबाद) : सोयगावसह तालुक्याला शनिवारी पहाटे पासून अचानक वादळी वाऱ्याने झोडपले. पहाटे-पहाटे रब्बीच्या पिकांवर संकट कोसळले. वाऱ्याचा वेग जोरदार असल्याने काही भागात कापणीवर आलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले. तसेच रब्बी ज्वारीसह मका, गहू, आदी रब्बीचे पिके जमीनदोस्त झाली.

या वाऱ्याने फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले. खरिपाच्या अवकाळीनंतर पुन्हा रबीवर वादळी वारे घोंगावले. तीन हजार हेक्टरवरील रब्बीची पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सोयगाव तालुक्याच्या पायथ्याशी असलेल्या अजिंठ्याच्या डोंगरात अचानक चक्रीवादळ तयार होवून शनिवारी पहाटे चार वाजेपासून हे चक्रीवादळ तालुकाभर घोंगावले. यामध्ये मात्र रब्बीच्या पिकांचे तब्बल ७० टक्के नुकसान झाले असून या नुकसानीत तीन हजार हेक्टर वरील मका,ज्वारी,गहू आदि पिके जमीनदोस्त झाली आहेत.

रब्बीच्या ज्वारीची काही भागात कापणी हाती घेण्यात आली होती. परंतु अचानक तयार झालेल्या या वादळाने मात्र बहरलेल्या ज्वारीला जमीनदोस्त करून टाकले. सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामातही अवकाळी पावसाने ज्वारीचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे खरीपात ज्वारीचे उत्पन्न हातात न आल्याने कुटुंबाला खाण्यासाठी ज्वारी व्हावी, यासाठी रब्बीत ७९९ हेक्टरवर तालुक्यात ज्वारीचा पेरा झाला होता.

परंतु अचानक आलेल्या वादळाने मात्र रब्बीच्या ज्वारीलाही जमीन दाखविल्याने सोयगाव तालुक्यात दोन्ही हंगामात ज्वारीचे उत्पन्न न आल्याने मात्र तालुक्यात ज्वारीची टंचाई भासणार आहे. या वादळात मका, गहू आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, ७० टक्के रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

तीनही मंडळात धुमाकूळ 

सोयगाव शहरासह तालुक्यात सोयगाव, बनोटी आणि फर्दापूर या तीनही महसुली मंडळांत वादळी वाऱ्याचा जोर सात तास कायम राहिल्याने रब्बीच्या तब्बल ५२०० हेक्टरवरील पेरण्या झालेल्या पिकांपैकी तब्बल तीन हजार हेक्टर वरील पिकांना या वादळाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात सोयगाव तालुक्यातच अचानक वादळ आले होते.

शासनाचा अधिकारी अद्याप बांधावर नाही

सोयगावचा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र दिवसभरात तालुका कृषी विभागाचा एकाही अधिकारी शेतीच्या बांधावर आला नव्हता. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी जरंडी, निंबायती, आमखेडा आदी भागात नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांचे सांत्वन केले. जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने भेट घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी करणार असल्याचे पुष्पा काळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com