कळंब (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून सर्वस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. शासनाचे काही निर्णय निश्चितच चांगले असले तरी, १० ते १२ वीच्या शाळा बंद करण्याच्या निर्णय मात्र पालकांच्या जिव्हारी लागला आहे. कोरोनाचे (Corona) काटेकोर नियम पाळले जात असलेल्या शाळा (School) बंद करण्याच्या निर्णयाला पालकांमधून कडाडून विरोध केला जात असून शाळा बंद ठेवल्याने कोरोना नियंत्रित होईल का? असे संतप्त प्रश्न उपस्थित केले जात असून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Kaustubh Diwegaonkar) यांना या संदर्भात पालकांनी बुधवार (ता.१२) निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आणि नेमक्या त्याच दिवशी महाराष्ट्रातील शाळा बंद करण्याची घोषना राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. राज्यातील शाळा बंद झाल्या आणि तत्पुर्वी जाहीर केलेल्या इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षांचे वेळा पत्रका बाबतचा संभ्रम विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांमध्येही निर्माण झाला आहे. (Can Corona Control If Schools Shut Down, Parents Ask Question)
मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा व त्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांवर झालेले अनेक दुष्परिणाम समोर आल्यानंतर नुकत्याच सुरळीत चालु झाल्या होत्या. मात्र, कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता शासनाने पुन्हा शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. ५० टक्के उपस्थितीत सगळे चालते, मग शाळा का चालत नाहीत?, असा संतप्त सवाल पालकानी उपस्थित केला आहे. सर्व चालू ठेवून फक्त शाळाच बंद ठेवल्याने कोरोना नियंत्रणात येणार आहे काय? हा सवाल येथील सामाजिक कार्येकर्ते तथा पालक संतोष भांडे यांनी उपस्थित केला असून इयत्ता १२ वी बोर्डाच्या परीक्षा ता.१४ फेब्रुवारी २०२२ पासून आॅफलाईन घेण्याचे शासनाने वेळापत्रक जाहीर केलेले आहे, इयत्ता १० वी आणि १२ वी वर्गाचे प्रात्यक्षिक व मुल्यमापनपूरक कामकाज सर्व शाळा आणि काॅलेजमध्ये अद्याप अपुर्ण आहे.
इयत्ता १० वी आणि १२ वीचे अध्यापन कार्य केवळ ऑनलाईन झालेले आहे. या बाबतीतही विद्यार्थ्यांच्या समस्या निवारण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. पूर्व वार्षिक सराव परीक्षा घेणे गरजेचे आहे. शासनाने नियोजनाप्रमाणे १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळा, महाविद्यालयात शंभर टक्के करण्याचा विचार आहे. कोरोना लसीची दुसरी मात्रा ता.३१ जानेवारीपासून देणे आवश्यक आहे. पण हे विद्यार्थी शाळा व महाविद्यालयापासून दुर गेल्यास दुसरी मात्रा वेळेत देणे शक्य होणार नाही. तसेच नीट/जेईई/सीईटी सारख्या उच्च शिक्षणाच्या पायाभुत पात्रता परीक्षांच्या तयारी करीता इयत्ता १० वी ते १२ वी पर्यंन्तच्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन/क्लासेसची गरज असणार आहे. तसेच खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेवर व गुणवत्तेवर दुष्परिणाम होतो आहे. अशा सर्व समस्या आता विद्यार्थी, पालक व शिक्षकांना सतावत असून सामान्य पालक आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत चिंतातूर असल्याचे आता जाणवत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या सर्व नियम पाळून शाळा चालू ठेववव्यात असेही म्हटले आहे. निवेदनावर संतोष भांडे, ओंकार कुलकर्णी, अमोल शेळके, सतपाल बनसोडे, किशोर वाघमारे, कुंदन गायकवाड, सिद्धार्थ बनसोडे, राजाभाऊ गायकवाड, बाळासाहेब कोळपे, अनिल गाडे, संजय जाधवर आदींनी दिले आहे.