पदवीधरांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश आणण्यासाठी पुन्हा 'सच' : मुख्यमंत्री ठाकरे 

SATISH UDDHAV.jpg
SATISH UDDHAV.jpg

औरंगाबाद : पदवीधरांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश आणण्यासाठी पुन्हा सतीश चव्हाण यांचा विजय महत्त्वाचा आहे. तीन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी केले आहे.  

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची रणधूमाळी सुरु आहे. त्या अनुषंगाने मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रचार सभा घेतल्या जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण हे असून त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी झुम व फेसबुकच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पुढे बोलताना मुख्य़मंत्री ठाकरे म्हणाले की, मला कोणताही अनुभव नसताना मी मुख्यमंत्री पदावर बसलो. माझ्यासारख्या नवख्या मुख्यमंत्र्याला मात्र सतीश चव्हाण यांच्या सारख्या अनुभवी आमदारांची साथ लाभलेली आहे. सतीश चव्हाण हे सभागृहात सातत्याने पदवीधरांचे प्रश्न मांडत आले. असा सच्चा कार्यकर्ता पुन्हा पदवीधरांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश आणण्यासाठी हवा आहे. त्यांचा विजय हा अत्यंत प्रतिष्ठेचा विषय असून एकेकाळी आपण राजकीय विरोधक जरी असलो तरी आपण एकत्र आलो आहोत. सर्वांनी सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी काम करायचे आहे. मराठवाड्यातील पदवीधर मतदार जनता देखील तुमचे कार्य पाहून तुम्हालाच विजय करतील असा विश्वास आहे. 

आई वडील असंख्य खस्ता खावून आपल्या पाल्याला उच्च शिक्षण देतात. मात्र, त्याच पदवीधरांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे त्या शिक्षणाचा उपयोग तरी कसा होणार. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या सावटात देखील जवळपास 50 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरी आणि व्यवसायाची मोठी संधी मिळणार आहे. असाच पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांचा जीवनात समृद्धीचा प्रकाश आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार काम करीत आहे. त्यासाठी सतीश चव्हाण ('सच') यांचा विजय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.

कोविड नसता तर अधिक झेप घेतली असती
प्रामुख्याने उद्योग क्षेत्रात आपण गेल्या ८-९ महिन्यांमध्ये ५० हजार कोटीहून अधिकचे सामंजस्य करार केले. या उद्योग कंपन्यांना जमीनींचे वाटप आदी ६० टक्के कामे आधीच पुर्ण झाली होती. पण उर्वरित कामे देखील आपण कोरोनाच्या कामात पुर्ण करून हे उद्योग लवकरात लवकर कसे उभे राहतील, त्यातून नवीत तरूण पदवीधरांच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले. शेवटी उद्योग कुणासाठी तर तरुण, पदवीधरांसाठी. त्यांना नोकरी, उद्योग मिळाले तर त्यांच्या पदवीला महत्व, त्यासाठीच आपण पदवी घेतो. त्यामुळे केवळ निवडणूक आली की तुमच्या कडे मतं मागायला यायचं अस हे सरकार नाही. एक संवेदनशील सरकार आता राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रामाणिक प्रयत्न केले जातील. पदवीधरांचे काही प्रश्न सुटल तर काही अजून शिल्लक आहेत. अजून चार वर्ष आहेत, त्यापुढच्या अनेक वर्ष देखील आपल्याला काम करण्याची संधी आहे, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

तीन ठिकाणी होती व्यवस्था 
औरंगाबादमध्ये मध्य विधानसभा मतदार संघासाठी तापडीया नाट्यमंदिर, पुर्व मतदार संघासाठी हॉटेल विंडसर व पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी हॉटेल विट्स येथे हे ऑनलाईन प्रचार ऐकण्याची शिवसेनेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com