बीडकरांनो सावधान ! जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा वेग वाढतोय, मृत्यूची संख्या चिंताजनक 

corona death.jpg
corona death.jpg

बीड : मधल्या काळात कोरोनाचा वेग मंदावल्याचे जाणवले. परंतु, या दोन दिवसांत कोरोना मीटर पुन्हा सव्वाशेंपर्यंत पोचले आहे. गुरुवारी (ता. १५) १२९ तर शुक्रवारी (ता. सोळा) आणखी १२१ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. मृत्यूची संख्याही पुन्हा वाढून हा आकडा सातवर पोचला. 

सरत्या आठवड्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या व मृत्यूंची संख्या घटल्याचे दिसत होते. वास्तविक रॅपिड अँटीजेन व थ्रोट स्वॅब तपासण्यांची संख्याही घटलेलीच आहे. मात्र, काही दिवस सहाशे-साडेसहाशे पर्यंतच्या थ्रोट स्वॅब व रॅपिड अँटीजेन तपासण्यात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या शंभरीच्या आत आली होती. मात्र, गुरुवारपासून पुन्हा नियमित आढळणाऱ्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गुरुवारी नवीन १२९ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी ६४७ लोकांच्या तपासणीत १२१ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यात ५२६ स्वॅब निगेटीव्ह आले. बीडमध्ये पुन्हा एकदा सर्वाधिक ४० रुग्ण आढळून आले. यात ग्रामीण भागातील रुग्णांचाही समावेश आहे. आष्टी १४, अंबाजोगाई १०, धारूर १२, केज आठ, माजलगाव १०, परळी दोन, पाटोदा आठ, शिरुर दहा तर वडवणीत तीन रुग्ण आढळले. या रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या १२,०७४ झाली. शुक्रवारी आणखी ८९ रुग्ण उपचारानंतर कोरोनावर मात करून घरी गेले. आतापर्यंत १०,२५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १४५८ रुग्णांवर विविध रुग्णालयांसह कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. 

मृत्यूचा आकडाही पुन्हा वाढला 
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूंमध्येही घट झाली होती. परंतु, शुक्रवारी पुन्हा सात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत ३६४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यातील चार मृत्यूंची नोंद इतर जिल्ह्यांच्या पेार्टलवर झाली. 

काळजी वाढली पण लोकांची बेफिकीरी कायम 
कोरोनाचा लॉकडाऊन हळूहळू अगदीच शिथिल झाला आहे. आता दुकानांच्या वेळा वाढल्या असून आठवडे बाजारही सुरू झाले आहेत. यामुळे काळजी वाढली असली तरी लोकांमध्ये बेफिकीरी मात्र कायम आहे. बाजारांमध्ये तुडुंब गर्दी आणि दुकानदार आणि ग्राहकी मास्कविनाच असेच काहीसे चित्र आहे. 

सुरुवातीच्या लॉकडाऊनची कडक अंबलमबजावणी आणि पालन करणाऱ्या जिल्ह्यात आता रुग्णसंख्या १२ हजारांच्या पुढे (१२०७४) गेली आहे. आणखीही रोज शंभरापुढे रुग्ण आढळत आहे. पूर्वी शहरात आढळणारा कोरोना आता गावखेड्यांपर्यंत पोचला आहे. साडेसहाशेवर गावांत कोरोनाने धडक मारली आहे. आता तर दुकानांच्या वेळा वाढून रात्री नऊपर्यंत परवानगीचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

दोन दुकानदारांत आणि ग्राहकांत सहा फूट अंतराचे बंधन घातले असले तरी त्याचे पालन होत नाही. शहरात ग्रामीण भागात तोंडावर मास्कचा वापर दिसत नाही. दुकानांमध्ये तुडुंब गर्दी आणि ग्राहक व दुकानदारांचे तोंडाला तोंड असेच चित्र आहे. मृत्यूंची संख्या वाढत असताना लोक एवढे निर्धास्त कसे असा प्रश्न पडत आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com