औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लस मिळेल का? म्हणून नागरिक मोठ्या संख्येने केंद्रांवर रांगा लावत होते. रांगेत हाणामाऱ्या होत होत्या पण आता चित्र पालटले असून, लसीकरण केंद्रावर काही दिवसांपासून शुकशुकाट दिसून येत आहे. शासनाने सध्या ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू ठेवले आहे. महापालिकेने आत्तापर्यंत ४५ वर्षावरील सुमारे दीड लाख नागरिकांना पहिला डोस दिला. तीन लाख नागरिक अद्याप राहिलेले आहेत. पण हे नागरिक लस घेण्यासाठी उत्साह दाखवत नसल्याने महापालिकेने ४५ वर्षावरील नागरिकांनी पहिला डोस घ्यावा, असे आवाहन केले आहे.
राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला स्थगिती दिल्यापासून व कोविशिल्डच्या दोन लसीमधील अंतर ८४ दिवसांचे केल्याने शहरातील लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली आहे. शहरात ४५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे साडेचार लाख एवढी आहे. महापालिकेने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रावर आत्तापर्यंत ६० वर्षावरील ६२ हजार ५७८ तर ४५ वर्षावरील ८५ हजार ७७२ नागरिकांनी अशा एक लाख ४८ हजार ३०० नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
त्यामुळे अद्यापही तीन लाख नागरिकांनी लस घेतलेली नाही. दरम्यान महापालिकेला लससाठा वारंवार मिळत आहे. महापालिकेकडे १५ हजार ५०० कोविशिल्ड लस शिल्लक असून, शुक्रवारी आणखी सात हजार ९०० लसी आल्या. आता २३ हजार लसीचा साठा शिल्लक आहे. कोवॅक्सिन लसीचे ५०० डोस मिळाले असून, त्याचा वापर केवळ दुसऱ्या डोससाठी केला जाणार आहे.
दहा हजार नागरिक राहिले
१८ ते ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. पण आता ही संख्या कमी होत आहे. कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी पाच हजार तर कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी पाच हजार असे १० हजार जण वेटींगवर आहेत. पण त्यापेक्षा कितीतरी जास्त लस महापालिकेकडे असल्याने ४५ वर्षावरील नागरिकांनी लसीचा पहिला डोस घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.