... अखेर त्याच्यासोबतच झाले तिचे थाटात लग्न

File photo
File photo

उमरगा (जि. उस्मानाबाद) - तालुक्‍यातील एकुरगा गावात 24 मे रोजी होणारा नियोजित बालविवाह जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने रोखला होता. 18 वर्षे पूर्ण झाल्याने संबंधित मुलीचा विवाह सोमवारी (ता. दोन) एकुरगा येथे थाटात पार पडला. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समिती, जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात झाला. 

कुटुंबीयांचे समुपदेशन 
जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना गेल्या 21 मे रोजी संबंधित मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे ही माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मुलीचे गाव गाठून पालकांची भेट घेतली. तसेच या सर्वांनी मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करीत मुलीचा विवाह 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करा, असे समजावून सांगितले. त्यावेळी मुलीचे वय सतरा वर्षे सहा महिने होते. सर्वांनी समुपदेशन केल्याने कुटुंबीयांनी तिचा विवाह 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला होता. 

नियोजित वराबरोबर झाले शुभमंगल 
संबंधित मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याने आज तिचा विवाह थाटात पार पडला. विशेष म्हणजे त्यावेळच्या नियोजित वराबरोबर तिचे शुभमंगल झाले. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य बिद्री, महिला समुपदेशक राऊ भोसले, दक्षता कमिटीच्या सदस्य सरोजा सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, रेखा पवार, मंजूषा चव्हाण, सोनल पट्टेवार, कल्पना कांबळे, नगरसेवक गोविंद घोडके आदींनी वधू-वराला शुभेच्छा दिल्या. जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य महिलांनी मुलीच्या आईला आर्थिक मदत दिली. सरपंच श्रीमती पाटील, पोलिस पाटील महेशंकर पाटील उपस्थित होते. 

संकटग्रस्त मुलांसाठी 'चाईल्ड लाईन' 
बालविवाह रोखण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत चाईल्ड लाईन ही एक सेवाभावी अशासकीय संस्था कार्यरत आहे. ही संस्था देशभरात 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी 24 तास अविरतपणे कार्य करते. अनाथ मुले, भिक्षेकरी, पिडीत, अन्यायग्रस्त, हरवलेली वा सापडलेली मुले, बालकामगार, बालविवाह यास बळी पडलेल्या मुलामुलींसाठी ही संस्था कार्यरत आहे. चाईल्ड लाईन अशा संकटग्रस्त मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन, समुपदेशन करून त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. मुलींनी प्रथमत: शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे निर्णयक्षमता येऊन बालविवाहाला आळा घातला जाऊ शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com