लातूर जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना : आई मी पास झाले ग...पण निकाल सांगू तरी कोणाला..

रेणुका गुंडरे.jpg
रेणुका गुंडरे.jpg

जळकोट :  आई....मी तुला अगोदर बोलल्याप्रमाणे दहावीला ९३.२० टक्के घेतले ग...पण माझा निकाल ऎकायला राहिली नाहीस...हा निकाल आता कोणाला सांगू? अशी आर्त किंकाळी ऎकुन सर्वांचे ह्रदय पिळवटून निघाले. कौतुक, शाबासकीची पाठीवर थाप मारायला घरी आई-वडीलच नसल्याने सांत्वन करताना कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही.

होकर्णा (ता.जळकोट) येथील रेणुका दिलीप गुंडरे या विद्यार्थ्यीनीच्या आयुष्यातील ही घटना आहे. रेणूकाचे प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण हे वंजारवाडा (ता. जळकोट) येथील श्री. संत गोविंद स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घेत होती. अतिशय गरीबी, हलाखीची परिस्थितीत मोठ्या जिद्दीने ती शिकत होती. ती हुशार असल्याने सर्व शिक्षकांचे लक्ष होते. 

आठ वर्षांपूर्वी वडीलांचे निधन झाले होते. आई आणि तीन बहिणी असे कुटुंब. गरीबीत आईच कुटुंबाचा गाडा ओढत होती. तिला आपल्या परीने तिघी बहिणी मदत करत असत. मजुरी करत मुलींना शिकवणारी आई. रेणूकाचा आईवर जीव होता. सकाळी उठून आईचा चेहरा पाहून सर्वजणी अभ्यासाला लागत. परंतु नियतीला हे ही पाहवले नाही. गरीबी, कष्टातून शिक्षण घेणार्या बहिणींची आई देवाने हिरावून नेली.

आई...दहावीला चांगले मार्क घेऊन पास होणार. तुझे कष्ट वाया जाऊ देणार नाही. तुझे स्पप्न पूर्ण करणार ...! असे रेणूकाने अगोदरच सांगितलेले. पण दुर्देवाने निकालाच्या पहिल्या दिवशीच मंगळवारी (ता.२८) सर्पदंशाने तिच्या आईने जगाचा निरोप घेतला. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. गावावरही शोककळा पसरली. तर दहावीचा निकाल बुधवारी (ता.२९) लागला. मैत्रिणींनी रेणूकाचा निकाल पाहिला तर तिला ९३.२० टक्के गुण घेऊन ती गुणवंत ठरली. ती आता मोठ्या दु:खात असून तिला निकालापेक्षा आईचे जाणे काळजाला धक्का देणारे ठरले आहे. 

'आई...मी पास झाले ग....पण निकाल कोणाला सांगू...?' तू माझा निकाल ऎकायला राहिली नाहीस... ही आर्त किंकाळी सर्वांचे ह्रदय पिळवटून टाकत आहे. तिचे अभिनंदन करावे का सांत्वन? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. उज्ज्वल यशाला दु:खाची किनार लागली असून आई-वडिल नाहीत, घरात वडिलधारी कोणी नाही. गरीबी, हलाखीची परिस्थितीत तिच्यासह बहिणींना शिक्षणासाठी समाजातील मदत करणारे संवेदनशील हात पुढे येणे गरजेचे आहे. तिचे अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. खूप गुणवत्ता आहे. परंतु आर्थिक आधार मात्र राहिला नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.. 

संपादन-प्रताप अवचार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com