अर्धापूर : लेकीच्या लग्नात अनावश्यक खर्चाला फाटा देत पुण्यातील (Pune) डॉ. मिलिंद भोई (Dr. Milind Bhoi)यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलेला घर (Home)बांधून देण्याचा संकल्प केला. त्यानुसार शहरातील कृष्णानगर भागात घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानतर्फे गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात पुण्यजागर प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती देण्यात येते. शेतकरी कुटुंबातील सदस्यांना पुण्यातील विविध कुटुंबांत नेऊन दहा दिवस दिवाळी साजरी केली जाते. संबंधित कुटुंब सुशिक्षित, आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रतिष्ठानतर्फे पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांची मुलगी गायत्री हिचा विवाह शनिवारी (ता.२२) ऋषिकेश गोसावी यांच्याशी पुण्यात होणार आहे. लग्नाची तयारी सुरू असताना शहरातील लक्ष्मी साखरे यांच्या घराचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याची काळजी घेतली जात होती.
बांधकामासाठी पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत वीरकर, नागोराव भांगे, डॉ. वैभव पुरंदरे, सुधाकर टाक, दिलीप डाढळे, दत्ता टोकलवाड, पूरभाजी कानोडे, अमृता इंदेवाड, राजू लोणे, शंकर ढगे, प्रल्हाद माटे, गजानन मेटकर, शेख जुबेर, उद्धव सरोदे, दिगांबर सोळंके, जावेद मिस्त्री आदींचे सहकार्य लाभत आहे
पुढील महिन्यात गृहप्रवेश
नापिकी, कर्जाला कंटाळून लक्ष्मी साखरे यांच्या पतीने आत्महत्या केली होती. त्यांना दोन लहान मुली, मुलगा आहे. अत्यल्प शेती, घरात कर्ता पुरुष नाही, पाल्यांचे शिक्षण आदी अडचणींचा सामना करणाऱ्या साखरे कुटुंबाला मदतीसाठी भोई प्रतिष्ठान धावून आले. गायत्री-ऋषिकेश यांचा विवाह झाल्यानंतर नवदांपत्याच्या उपस्थित पुढील महिन्यात गृहप्रवेश करून दिला जाणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.