आठवड्यातून तीन दिवस हैदराबाद हडपसर सुपरफास्ट सुरू
उस्मानाबाद: उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याला रेल्वेकडून नवीन एका गाडीचे गिफ्ट मिळाले. आठवड्यातून तीन दिवस हैदराबाद ते हडपसर (पुणे) अशी रेल्वेगाडी सुरू झाली आहे. उस्मानाबाद तसेच लातूर जिल्ह्यासाठी ही रेल्वे सोयीची ठरत असून, पहाटे रेल्वेने निघाल्यानंतर शासकीय कामकाजाच्या वेळेत पुण्यात पोचण्यासाठी ही रेल्वे फायद्याची ठरणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रेल्वेसेवा हळूहळू सुरू होत आहेत. यातील एका रेल्वेगाडीचा फायदा उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत आहेत. पहाटे उठून सकाळी अकरापर्यंत पुण्यात पोचण्यासाठीची ही रेल्वेची फेरी दोन्ही जिल्ह्यांना फायदेशीर ठरणार आहे. हैदराबादहून निघणारी रेल्वे रविवारी पहाटे साधारण पाच वाजता लातूरमध्ये येते. त्यानंतर उस्मानाबादमध्ये सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी पोचते. उस्मानाबादहून सकाळी सहा वाजता निघाल्यानंतर ती गाडी हडपसरला सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी पोचते. म्हणजे सकाळी उठून कार्यालयीन वेळेत पुण्यात पोचण्यासाठी ही रेल्वेगाडी फायद्याची ठरण्याचे संकेत आहेत.
यापूर्वी ही गाडी सकाळी सात वाजता उस्मानाबाद येथून निघून पुण्यात पावणे एकच्या दरम्यान पोचत असे. वेळेत बदल झाल्याने उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यासाठी ही गाडी चांगलीच फायद्याची ठरणार असल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. याशिवाय बार्शीलाही या गाडीचा फायदा होणार आहे. बार्शी शहरासह तालुक्यातील नागरिक पुण्याला जाण्यासाठी हुतात्मा एक्स्प्रेस (सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस) गाडीचा आधार घेत होते. त्यासाठी त्यांना कुर्डूवाडीला जावे लागत होते. मात्र, आता बार्शी शहरातच गाडी उपलब्ध झाल्याने बार्शीकरांनाही फायद्याचे ठरणार आहे.
दरम्यान, त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता ही गाडी हडपसरहून सुटणार आहे. संध्याकाळी सव्वासात वाजता उस्मानाबादला पोचणार आहे. लातूरमध्ये ही गाडी आठवाजेपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासाठी ही गाडी फारसी उपयुक्त ठरत नसली तरी हडपसर आणि परिसरात राहणाऱ्यांना ही सेवा चांगली ठरणार आहे.
हडपसरला सुविधांचा अभाव
दक्षिण-मध्य रेल्वेने ही गाडी सुरू केली आहे. सध्या हडपसर टर्मिनसचे काम सुरू आहे. अजूनही हडपसर रेल्वे स्थानकात फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. याशिवाय तेथून पुढे पुण्यात जाण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आता ही गाडी सुरू झाली असली तरी फारसी उपयुक्त ठरेल का? गाडी नियमित सुरू राहील का? अशा अनेक बाबींवर ही गाडीचे भवितव्य ठरणार आहे.
जिल्ह्यासाठी कोणतीही गाडी फायद्याचीच आहे. पण, सध्या ही गाडी हडपसरपर्यंत जात आहे. तेथून पुढे जाणेही अवघड बाब आहे. पुण्यात सकाळच्या सत्रात ट्रॅफीक जाम होते. त्यामुळे हडपसरच्याऐवजी पुण्यापर्यंत असायला हवी. तीन दिवसांऐवजी रोज असायला पाहिजे. तेथून येताना गाडी सायंकाळी पाच वाजता सुटायला पाहिजे. तर गाडी अधिक फायद्याची ठरेल.
- संजय मंत्री, माजी, मध्यरेल्वे सल्लागार समिती सदस्य.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.