Sahitya Sammelan News
Sahitya Sammelan News

उस्मानाबादेतील साहित्य संमेलनाचे भालचंद्र नेमाडेंना निमंत्रण

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना यंदा स्थान दिले गेले नसले तरी संमेलनाच्या माजी अध्यक्षांना मात्र देण्यात आले आहे. त्यासाठी सात पुर्वाध्यक्षांना साहित्य महामंडळ आणि आयोजक संस्थेने निमंत्रीत केले आहे. त्यांचा संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात विशेष सन्मानही केला जाणार आहे. त्यामुळे संमेलनाचे व्यासपीठ प्रथमच साहित्यिकांच्या उपस्थितीने फुललेले पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, ‘ज्ञानपीठ’प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनाही साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

साहित्य संमेलनाचे व्यासपीठ राजकीय नेत्यांच्या उपस्थितीने फुललेले पहायला मिळते. राजकीय नेत्यांच्या व्यासपीठावरील गर्दीमुळे संमेलनाध्यक्षसुद्धा बाजूला पडतात, असेही चित्र आजवर पहायला मिळाले आहे. त्यामुळे यंदा राजकीय नेत्यांना रसिक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे, सात पुर्वाध्यक्षांना निमंत्रण पाठवून त्यांना संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी काही माजी संमेलनाध्यक्षांच्या भेटीही आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्या आहेत. त्यामुळे किती माजी संमेलनाध्यक्ष संमेलनाला उपस्थित राहणार, याचीही अनेकांना उत्सुकता आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कवी फ. मुं. शिंदे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, अक्षयकुमार काळे, लक्ष्मीकांत देशमुख यांच्याबरोबरच मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांचा विशेष सन्मान साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. तसे पत्रही निमंत्रण पत्रिकेबरोबर त्यांना पाठविण्यात आले आहे. मात्र, इतर आठ संमेलनाध्यक्षांना संमेलनाला उपस्थित राहण्याबाबत आग्रह केला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, 'साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग आहे', अशा शब्दांत साहित्य संमेलनावर टीका केलेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनाही संमेलनाचे निमंत्रण देण्याच्या हालचाली आयोजक संस्थेने सुरू केल्या आहेत. त्यामुळे ते निमंत्रण स्वीकारणार का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. याआधी पंजाबमधील घुमान येथे झालेल्या संमेलनावेळी त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. पण ते पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे संमेलनाला उपस्थित राहिले नाहीत, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

निमंत्रण पाठविण्याचे काम अजूनही सुरूच
टपाल खात्याबरोबरच प्रत्यक्ष गाठीभेटी, -मेलच्या माध्यमातून साहित्य संमेलनाच्या पत्रिका लेखक-प्रकाशकांपर्यंत पोचविल्या जात आहेत. उद्‌घाटक लवकर न ठरल्यामुळे निमंत्रण पत्रिकांची छपाई उशिरा झाली. त्यामुळे आयोजकांची अजूनही निमंत्रण पत्रिका पोचविण्याची धडपड सुरूच आहे. ज्येष्ठ साहित्यिक आ. . साळुंखे, पानीपतकार विश्वास पाटील, महेश केळुस्कर अशा अनेक साहित्यिकांना पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. नेमाडे यांच्याबरोबरच डॉ. रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे, हरी नरके अशा अनेक मान्यवर लेखकांना निमंत्रण पाठविण्याचे काम अजूनही सुरू आहे, अशी माहिती आयोजक संस्थेतर्फे देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com