विधान परिषद निकालांमुळे भाजपच्या सत्तापरिवर्तनाच्या स्वप्नांवर पाणी

satta.jpg
satta.jpg

बीड ः मध्यप्रदेशातील सत्तापालट आणि बिहार निवडणुकीतील यश या आत्मविश्वासाच्या बळावर या निवडणुकीत अधिकचे यश मिळवून त्याअधारे सत्ताधाऱ्यांना नमोहरम करत सत्तापलाटचे फासे आवळायचे भाजपचे गणित आणि स्वप्न धुळीस मिळाले आहे. या निकालातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा राजकीय मुत्सदीपणात पुढेच असल्याचेही सिद्ध झाले. 

हा निकाल म्हणजे महाविकास आघाडीचा कॉन्फीडन्स आणि तीन पक्षांतील एकमेकांबद्दल विश्वास वाढविण्यासाठीही पुरक ठरला. भाजपला आणि या पक्षाच्या नेत्यांना अतिआत्मविश्वास आणि एकला चलोरेची भुमिका नडल्याचेही निकालातून सिद्ध झाले. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हाती काहीच लागले नाही हेही विशेष. विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा सहा जागांचे निकाल शुक्रवारी (ता. चार) पहाटेपर्यंत हाती आले. एकमेव धुळे - नंदूरबार या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले. तर, मराठवाडा पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड, पुणे शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे जयंत आसगावकर, नागपूर पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे अभिजीत वंजारी तर अमरावती शिक्षक मतदार संघातून अपक्ष किरण सरनाईक विजयी झाले. सहा पैकी चार जागा महाविकास आघाडीने मिळविल्या तर भाजपला एकमेव जागा जिंकता आली. विशेष म्हणजे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राऊंड आणि अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या पुणे या दोन पदवीधर मतदार संघातही सत्ताधाऱ्यांनी झेंडे फडकविले. या निवडणुकीत जशी भाजपची धोबीपछाड झाली तसे शिवसेनेच्या हातीही काही लागले नाही. मात्र, हा निकालामुळे भाजपने आखलेली अनेक गणिते बिघडविणारा आहे. सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीला ऐनकेन प्रकारे खिंडीत गाठण्याचे, त्यांच्यात अंतर्गत संभ्रम निर्माण करण्याचे भाजपचे आजपर्यंतचे प्रयत्न असफल ठरले आहेत.

कोरोना उपाय योजनांच्या बाबतीतही भाजपने सरकार विरोधी सुरु आळविला पण लोकांतून याला फारसा प्रतिसाद भेटला नाही. अगदी सुरुवातीच माझं आंगण माझं रणांगण या आंदोलनातून तर पक्षकार्यकर्त्यांनीच काढता पाय घेतला होता. काही आंदोलनांना प्रतिसादही भेटला. पण, काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात मिळविलेली सत्ता आणि अलिकडे बिहार निवडणुकीतील यशाच्या वातावरणात या निवडणुकीत जादा जागा जिंकल्या तर अपोआप सत्ताधाऱ्यांचे मॉरल डाऊन होईल आणि या विजयाच्या आत्मविश्वासावर कोरोना काळात भ्रष्टाचारासारखे संवेदनशिल मुद्दे काढून लोकांमध्ये स्थान मिळवितानाच सत्ताधाऱ्यांत संभ्रम निर्माण करुन राज्यातही मध्यप्रदेश पॅटर्नची भाजपची रणनिती होती. 

राज्यपाल नियुक्त जागांसाठीच्या यादीवर राज्यपालांची स्वाक्षरी होण्यास लागलेला विलंब हेच यामागील कारण आहे. पण, निकालानंतर झाले ते भलतेच. भाजपला पुन्हा एकदा अतिआत्मविश्वास आणि एकला चलोरेची भुमिका नडली. महायुती म्हणण्यापुरती ठेवली आणि निवडणुकीत भाजपचेच घोडे दामटले. त्यात उमेदवारांच्या यादीवर नजर मारली तर भाजपमध्येही फडणविसांनी स्वत:चेच घोडे दामटल्याने स्थानिक पातळीवर गटबाजीही उफाळली. यामुळे फार काही बरे नसलेल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतील विसंवाद आणि लोकांमध्ये असलेली काही प्रमाणातील नाराजी झाकून गेली. परिणामी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मोठ्या निवडणुकांत विरोधकांना धुळ चारल्याने कॉन्फीडन्स तर वाढलाच आहे. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात या तिघांच्या पक्षांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लाऊन काम केल्याने त्यांच्यातील एकमेकांबद्दची विश्वासहार्यताही वाढण्यास मदत झाली. पण, या विजयाचा वाटा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच हाती आला. शिवसेनेचे हात मात्र रिकामे राहीले.

(Editior- pratap awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com