'मांजरा' तेरा वेळेस भरले, तेरा वेळेस रिकामे

Manjra dam.jpg
Manjra dam.jpg

लातूर : लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मांजरा धरण तयार होवून आतापर्यंत ४० वर्षात आतापर्यंत हे धरण तेरा वेळेस भरले व तेरा वेळेस रिकामे राहिले आहे. इतर वर्षी फारसी समाधानकारक पाणीसाठा या धरणात झालेला दिसत नाही. त्यात गेल्या काही वर्षात तर पावसाच्या बदलत्या पॅटर्नमुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर परिणाम दिसत आहे.

धरणाच्या खालच्या बाजूलाच जास्त पाऊस पडत आहे. याचा परिणाम पिण्याचे पाणी तसेच सिंचनाच्या पाण्यावर होत आहे. नवव्या वर्षी भरले पहिल्यांदा धरण लातूर, अंबाजोगाई, कळंब, केज अशा मोठ्या शहराची पाण्याची तसेच सिंचनाची सोय व्हावी म्हणून हे धरण बांधण्यात आले. यात १९८० पासून पाणी साठवण्यास सुरवात झाली. नऊ वर्षानंतर म्हणजे १९८८-८९ मध्ये हे धरण पहिल्यांदा शंभर टक्के भरले. ते सलग तीन वर्ष शंभर टक्के भरत गेले. त्यानंतर मात्र पुढील काही वर्ष पाऊस कमी राहिल्याने पाणीसाठा कमी राहिला.

पडला तर सलग नाही तर कोरडा

या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला तर सलग एक दोन वर्ष चांगला पडतो. त्यानंतर मात्र कोरडा दुष्काळ असतो.
त्यात २००१ ते २००५ ही सलग चार वर्ष तसेच २०१२ ते २०१६ ही सलग चार वर्ष या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे लातूरला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले इतकेच नव्हे तर रेल्वेनेही पाणी पुरवठा करावा लागला होता.

पाणी योजनासह सिंचनावर परिणाम

या धरणावर १६ पाणी पुरवठा योजना आहेत. तर १८ हजार २२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाचे आहे. आतापर्यंत हे धरण तेरा वेळेस शंभर व तेरा वेळेस शुन्य टक्के भरे. पाच वेळेस ७० ते ९० टक्केपर्यंत, दोन वेळा ५० ते ७० टक्के व सात वेळा ५० टक्केपर्यंत भरले आहे. अनियमित पावसाचा धरणावरील पाणी पुरवठा योजना व सिंचना क्षेत्रावर परिणाम होताना दिसत आहे.

या वर्षी पुन्हा शंभर टक्के

गेली दोन वर्षे म्हणजे २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा होता. आता पुन्हा हे धरण यावर्षी शंभर टक्के भरत आले आहे. ता. २२ आक्टोबर रोजी या धरणात ९४.४४ टक्के पाणीसाठा होता. ही तीनही जिल्ह्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.

धरणाची माहिती

  • प्रकल्पीय पाणीसाठा- २२४.०९ दशलक्ष घनमीटर.
  • उपयुक्त पाणीसाठा---१७६.९६ दशलक्षघनमीटर
  • मृत पाणीसाठा---४७.१३० दशलक्षघनमीटर
  • सिंचन क्षेत्र --१८ हजार २२३ हेक्टर
  • उजवा कालवा --७६ किलोमीटर
  • डावा कालवा--९० किलोमीटर
  • धरणावरील पाणी पुरवठा योजनाची संख्या---१६
  • पिण्यासाठी आरक्षीत पाणी--६१.९३ दशलक्षघनमीटर

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे अनियमित प्रमाण राहिल्याचा हा परिणाम आहे. त्यात गेल्या काही वर्षात तर धरणाच्या पाणलोटपेक्षा खालच्या क्षेत्रातच अधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे कधी मांजरा नदीच्या पात्रात पाणी दिसते पण धरणातील पाणीसाठा मात्र वाढत नाही.
 रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com