परभणी : उत्तर भारतातील हिमवृष्टीचा परिणाम म्हणून मराठवाड्यात थंडीची लाट पसरली आहे. दोन दिवसांपासून परभणीत सर्वात कमी तापमानाची नोंद होत असताना रविवारी (ता.२९) पारा आणखी खाली घसरला आहे. ९. ५ अंश तापमानाची नोंद परभणीत झाली आहे. तसेच परभणीपाठोपाठ औरंगाबाद येथे १०.७, नांदेड १३, बीड १३.६ अंश असे निचांकी तापमान नोंदवले गेले आहे. जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, आणखी थंडी वाढणार असल्याची माहिती येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने दिली आहे.
डिसेंबर महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अधुन-मधुन ढगाळ वातावरण आणि मध्येच सुर्यप्रकाश अशा उनसावलीच्या खेळात थंडी गायब झाली होती. साधारण दोन आठवडे थंडी गायब झाली होती. मागील दोन दिवस सुर्यदर्शन झाले नव्हते. त्यात दिवसा थंडगार वारे वाहु लागल्याने थंडीचा कडाका वाढण्यास सुरवात झाल्याने रविवारी देखील दिवसभर उनसावलीचा खेळ सुरु होता. सकाळपासूनच हुडहुडी भरणारे वारे वाहु लागल्याने सर्वत्र थंडगार वातावरण निर्माण झाले. भरदुपारी देखील थंडी वाजु लागल्याने अनेकांना उबदार कपड्यात दुपारीदेखील राहावे लागले. थंडगार वाऱ्यामुळे कडाक्यात आणखी भर पडली आहे.
हेही वाचा : नववर्षात परभणीकरांचे स्वप्न पूर्ण होणार !
कालव्याच्या पाण्याची पडली भर
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागात रविवारी (ता.२९) पहाटेचे तापमान ९.५ अंश एवढे नोंदवले गेले. तर दुपारच्या तापमानात देखील घट झाली आहे. दुपारी केवळे २५.२ एवढे कमी नोंदवले गेले. मराठवाड्यात सर्वात कमी तापमान परभणी शहरात नोंदवले जात आहे. सध्या परभणी शहराजवळुन जाणाऱ्या जायकवाडीच्या कालव्यास पाणी सुटलेले आहे. त्यामुळे थंडीत आणखी भर पडली आहे. परभणीपाठोपाठ औरंगाबाद येथे १०.७, नांदेड १३, बीड १३.६ अंश असे निचांकी तापमान नोंदवले गेले आहे. भारतीय हवामान विभागाकडे परभणीचे तापमान १०.४ तर कृषि विद्यापीठात ९.५ अंश अशी नोंद झाली आहे.
जनजीवन झाले विस्कळीत
थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पहाटे लवकर बाहेरगावी नोकरी, कामानिमित्त प्रवासाला जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. रविवारी शाळा आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने अनेकजण थंडीमुळे घराबाहेर पडले नसल्याने रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत होता.
हेही वाचा : शाळेच्या उभारणीसाठी ‘या’ गावचे ग्रामस्थ सरसावले
पिकांसाठी थंडी पोषक
यंदा थंडी अभावी रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली होती. ढगाळ वातावरण आणि थंडी गायब झाल्याने हरबरा, ज्वारी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. गहु पिकासाठी थंडी लाभदायक असल्याने अनके दिवसापासून शेतकरी थंडीची प्रतीक्षा करत होते. आता पेरणी होणाऱ्या आणि उगवलेल्या गव्हासाठी थंडी अत्यंत पोषक ठरणार आहे.
गतवर्षी झाला होता विक्रम
थंडीचा परभणीत दरवर्षी विक्रम होत आहे. गतवर्षी ता.२९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान, तापमान ३ अंशावर राहीले होते. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तापमान ४ ते ६ अंशावर होते. त्यानंतर ही सलग १० दिवस पारा नऊ अंशाच्या खाली होता. यंदा उशीरा का होईना परंतु आता थंडी सुरु झाली आहे.
दोन आठवडे थंडी राहणार
वाऱ्याचा वेग वाढला असून उत्तर भारतात हिमवृष्टी सुरु झाली आहे. त्यामुळे उत्तर भारताकडून येणारे वारे हे थंड असल्याने आणि वाऱ्याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे असल्याने विदर्भानंतर थेट मराठवाड्यात त्याचा प्रभाव जाणवत आहे. हा डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिण्याचा दोन अठवडे थंडीचे असतात. त्यामुळे आणखी दोन आठवडे थंडी राहील.
- डॉ. कैलास डाखोरे, विभागप्रमुख, ग्रामीण कृषि मौसम सेवा विभाग
....
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.