गंगापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यासाठी,त्यांच्या हक्कांसाठी आयटक संघटना लढत आलेली आहे आणि लढत राहणार फक्त कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता,कुठल्याही दबावाला बळी न पडता हा संप यशस्वी करायचा आहे. आपले संघटन टिकवून ठेवायचे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फुटपाड्यापासून सावध रहावे.
अंगणवाडी कर्मचारी, कष्टकरी व कामगारांसाठी संघर्षाचा धगधगता ज्वलंत इतिहास म्हणजे आयटक असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या कॉम्रेड शालिनी पगारे यांनी मंगळवारी (ता. पाच) केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतनश्रेणी लागू करावी किंवा वेतनश्रेणी लागू करे पर्यंत किमान वेतन कायद्यानुसार २६ हजार वेतन देण्यात यावे, निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या निम्मे पेन्शन दरमहा देण्याचा कायदा करावा, मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाड्यात रूपांतर करा, कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसेच ग्रॅच्युएटीचा लाभ देण्यात यावा, या इतर मागण्यांसाठी आयटकच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने गंगापूर पंचायत समितीवर निदर्शने करण्यात आली.
आयटकच्या राज्य सचिव कॉम्रेड शालिनीताई पगारे, जिल्हा संघटक विलास शेंगुळे, गंगापूर तालुका संघटक अश्विनी थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसानी सहभाग नोंदवला. यावेळी मार्गदर्शनात कॉम्रेड शालिनी पगारे यांनी हा लढा तीव्र करून आपल्या मागण्या सरकार दरबारी मंजूर करून घेण्यासाठी एकजुट दाखवा तसेच संप शंभर टक्के यशस्वी करा असे यावेळी त्या म्हणाल्या.दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी स्वीकारले.
यावेळी ज्योती कर्डक, वंदना संघवी, सुनीता पवार, राजश्री गोरे, निर्मला परदेशी, समीनदर नाईक, वैशाली साळुंके, यांच्यासह गंगापूर तालुक्यातील भेंडाळा, डोंणगाव, मालुजा, जांभळा, जिकठाण, शेंदूरवादा आदी विभागातील शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या.