भाग तीन :  नांदेड होते शैक्षणिक केंद्र व वैभवशाली नगर

file photo
file photo

नांदेड :  नांदेड हा नगर किल्ला असुन सातवहानांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौध्दपीठ होते. सांचीच्या स्तुपावरील दानलेखात त्याचा उल्लेख आढळतो. वाकाटका नंतर चालुक्य राष्ट्रकुट व गंग यांच्या काळात नांदेड हे शैक्षणिक केंद्र आणि वैभवशाली नगर होते. 

कसा होता नंदगिरी किल्ला
नंदगिरी किल्ल्यामध्ये मोठा हौद आहे. हैदराबाद निजामाच्या काळात गोदावरी नदीच्या पात्रातून पाणी या उंचीवर खेचुन येथे त्याचे शुद्धीकरण करून नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी त्याची बांधणी करण्यात आली होती. आता या हौदाचे चुकीच्या पध्दतीने नुतनीकरण केल्याने त्याचे कारंजे बनले आहे. पुष्कर्णीच्या पुढे नदीच्या काठाने काही निजाम काळात बांधलेल्या वास्तू व त्यांचे अवशेष आहेत. या वास्तू बांधताना किल्ल्याच्या मूळ वास्तू व त्यांच्या अवशेषांचा वापर केला गेला आहे. या अवशेषांच्या डाव्या बाजूला उंचावर एक बुरूज असुन अवशेषांच्या उजव्या बाजुला खालच्या अंगावर दुसरा बुरूज आहे. वरील बुरुजाचा भाग हा किल्ल्यातील सर्वात उंच भाग असुन तेथुन किल्ल्याचा बराचसा भाग व गोदावरीचे दुरवर पसरलेले पात्र नजरेस पडते. खालील बुरुजावर एक अखंड तोफ असुन या भागातील तटबंदी नव्याने विटांनी बांधलेली आहे. 

कोणी वसवले नांदेड शहर
येथुन पुढील भागात किल्ल्याचे उरलेले दोन बुरूज असुन या बुरुजांच्या शेजारीच विश्रामगृह बांधलेले आहे. यातील पहिल्या बुरुजाच्या खाली खडकात खोदलेले एक टाके असुन दगडात बांधलेले एक कोठार आहे. येथे मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने या वास्तू पटकन लक्षात येत नाही. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ला संपुर्णपणे आतबाहेर पहाण्यासाठी एक तास लागतो. किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नळ आहे. इतिहासात नंदीतट, नंदीनगर, नंदीग्राम इत्यादी नावाने प्रसिध्द असलेल नांदेड शहर नंद वंशातील राजाने वसवले. पैठण ही नंदवंशीय राजाची दक्षिण भारतातली राजधानी होती तर नंदाहार आणि नवनंदडेरा ही उपराजधानी होती. यातील नवनंदडेरा या नावाचा अपभ्रंश होऊन नांदेड झाले.

आज ह्या किल्ल्याची तटबंदी काही प्रमाणात का होईना उभी आहे. पण तटबंदीलगतच वस्ती झाल्यामुळे या तटबंदीही शेवटी घटका मोजताहेत. किल्ल्यावर एकूण पांच बुरुज होते. त्यापैकी तीन बुरुज नदीच्या पात्रालगत आहेत. अग्नेय दिशेकडील बुरुज सगळ्यात उंच बुरुज होता तो कदाचित नदीपात्रातील वाहतुकीवर नजर ठेवणारा टेहळणी बुरुज असावा. या बुरुजाचे नशीब तेवढे बलवत्तर, त्याची अनेकदा पुनर्बांधणी झालेली दिसते. हैद्राबादच्या निजाम हजरतानी तेथे एक छत्री उभी केली होती गेली पन्नास पंच्याहत्तर वर्ष ती आजही तग धरून आहे.

गोदावरी नदीने नांदेड नगरीभावती एक अर्धचंद्राकृती वळण घेतले आणि या वळणावर हा किल्ल्या उभा आहे. या किल्ल्याजवळ प्राचीन किल्ला घाट बांधलेला होता या बाजूची तटबंदी अजूनही पक्की उभी आहे. तटबंदीच्या भिंती सांगताहेत कि निजाम काळात त्याची दुरुस्ती झाली होती. दुरुस्तीचे खाणाखुणा या तटबंदीच्या उरावर दिसतात. तीन चारशे वर्षातले काही स्थापत्य अवशेष किल्ल्यात आहेत. एक मोठा हौद, कारंजे आणि त्याही पेक्षा महत्वाचा निजाम काळातल्या जलशुद्धी करणाऱ्या पुरावा म्हणून एक शिलालेख आहे. निजाम राजवटीत झालेल्या या कामाचा तपशील नोंदवत मंजूर झालेल्या रक्कमेपेक्षा कमी रक्कमेत हे काम झाले व उरलेली रक्कमही नोंदवले आहे.  तत्कालीन प्रशासकीय कामातली सचोटी नोंदवणारा हा शिलालेख आमच्या नजरेत अंजन घालणारा ठरावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com