भाग एक : नांदेडमध्ये आहे नंदगिरी किल्ला, पण...काय? ते वाचाच

nanded news
nanded news

नांदेड : ऐतहासिक व धार्मिक इतिहास लाभलेल्या नांदेड शहरात एक किल्लाही आहे. हे फार कुणाला माहित असेल, असे वाटत नाही. पण, ज्या नंदितटामुळे शहराला नांदेड हे नाव मिळआले, तेथील प्राचीन नंदगिरी किल्ल्याची आज चक्क हागणदारी झाली आहे. एकांतात अनेक गैरप्रकार पडक्या इमारतींतून चालतात. येथील निजामकालीन जलशुद्धीकरण प्रकल्प आज बंद असला, तरी किल्ल्याच्या आवारातील पाण्याच्या टाक्या आणि नव्याने झालेली बांधकामे, यामुळे परिसराचे ऐतिहासिक रुप हरवले आहे.

रामायण काळातले नंदिग्राम म्हणजे गोदावरीच्या काठावर वसलेले नांदेड शहर. वाकाटकांच्या वत्सगुल्म (वाशीम) ताम्रपटात नांदेडला नंदितट असेही म्हटले आहे. सातवाहनांची पहिली राजधानी असल्याने या नंदगिरीहून सातवाहन नृपती प्रतिष्ठानकडे (पैठण) वळले, असे इतिहास सांगतो. नदी काठावर शहराच्या पूर्वेस हा किल्ला आहे. जुन्या नांदेडमधील अरब गल्लीतून तिकडे जाता येते. नदीच्या पात्राकडील भव्य तटबंदी आणि सहा बलदंड बुरूज एवढीच किल्ल्याची ओळख आता शिल्लक आहे.मोठा विस्तार असलेल्या किल्ल्याभोवतीच्या तटबंदीच्या चार भिंतीचे अवशेष आजही आढळतात. किल्ल्यात निजामाने १९३६ मध्ये मराठवाड्यातील पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला. त्यासाठीची यंत्रणा खास इंग्लंडहून आणली होती. हा प्रकल्प आता बंद झाला आहे.

किल्ल्याचे बुरुजही ढासळले

जिल्हा नियोजन समितीने लावलेला माहितीफलक फाटला आहे. किल्ल्याचे बुरूज ढासळत आहेत. तटापर्यंत अतिक्रमणे भिडली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवर झाडे उगवून, त्यांच्या मुळांनी चिरे खिळखिळे केले आहेत. महापालिकेने विकसित करायला घेतलेल्या उद्यानात वाळलेला झाडपाला आणि कचरा साचला आहे. कुंडातील कारंजी बंद पडून शेवाळ साचले आहे.

राजकीय इच्छाशक्तीची गरज
राजकीय इच्छाशक्ती आणि नियोजनातील सरकारी बाबूगिरीचा दृष्टिकोन, यामुळे अजूनही हा किल्ला प्रकाशात आलेला नाही. जिल्हा प्रशासन, महापालिका, पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाने एकत्र येऊन योजना बनवल्यास नांदेडला येणारे पर्यटक किल्ल्यालाही भेट देऊ लागतील, यात शंका नाही.

सुभेदारी महालाचेही छत पडले
ज्या महालात बसून निजामाच्या सुभेदाराने तेलंगणाच्या कारभाराची सूत्रे हाकली, तो सुभेदारी महाल आता केवळ बडा घर, पोकळ वासा बनला आहे. सात खोल्या आणि दोन ओसऱ्यांच्या या महालचे छत कोसळले आहे. लाकडी तुळया आणि वासे गायब झाले आहेत. निजामकाळाच्या अखेरीच पाणीपुरवठा अधीक्षकांचे कार्यालय असलेल्या या इमारतीतून मुघलकाळात बादशहा औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याचा मुलगा खुदाबंद खानाचे काही काळ वास्तव्य होते. 

पडक्या खोल्या भरल्यात घाणीने
१७०८च्या सुमारास उमादतुलमुल्ला खान फिरोज जंग इथला सुभेदार होता. वऱ्हाडचीही सुभेदारी त्याच्याकडेच होती. सय्यद अब्दुल्लाह, साहुल्ला खान, अलीमुद्दीन खान अशा सुभेदारांनी राज्याचा कारभार हाकलेल्या या महालाची आज चक्क हागणदारी झाली आहे. पडक्या खोल्या घाणीने भरल्या आहेत. बुरूजावरील पॅगोडाकडे जाताना डाव्या बाजूच्या खोल्यांचा इथले लोक स्वच्छतागृह म्हणून वापर करतात. त्यामुळे गोदापात्राकडे उघडणाऱ्या या महालाच्या दारांतून दुर्गंधीचे भपकारे येतात.

एकुलती एक तोफही असुरक्षित
नंदगिरी किल्ल्यात एक उत्तम पोलादी बांगडी प्रकारातील तोफ आहे. तिची लांबी पाच फूट, तर परीघ दोन फूट आहे. तोंड फुटलेल्या अवस्थेतील ही तोफ मातीत पडलेली असून, तिला जमिनीपासून उंचावर ठेवणे गरजेचेआहे. राज्यात अनेक ठिकाणच्या तोफा चोरीला जाण्याचे प्रकार उघड होत आहेत. अशा वेळी या नंदगिरीच्या एकुलत्या एक तोफेला जपणे आवश्‍यक आहे.
(ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्याची सविस्तर माहिती खास ई-सकाळच्या वाचकांसाठी चार भागांमध्ये देत आहोत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com