जालन्यातील ९४ जणांना परजिल्ह्यात जाण्यास परवानगी

जालना शहर.
जालना शहर.

जालना - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सीलबंद केल्याने अत्यावश्यक कामांसाठी पोलिस प्रशासनाच्या परवानगीने नागरिकांना परजिल्ह्यात जाता येते. आतापर्यंत जिल्ह्यातील ९४ नागरिकांना परजिल्ह्यात जाण्याचा परवाना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तर जिल्हा अंतर्गत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एक हजार ८२५ जणांना पोलिसांकडून परवानगीचे स्टिकर्स देण्यात आले आहेत. 

देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन लागू केल्याने राज्यातील वाहतूक बंद करण्यात आली. तसेच प्रत्येक जिल्ह्याची सीमा सीलबंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बस, रेल्वे, विमान सेवाही बंद आहे.

अत्यावश्यक कामांसाठी पोलिस प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर नागरिकांना परजिल्ह्यात जाता येते. आतापर्यंत जिल्ह्यातील ९४ नागरिकांना पोलिस प्रशासनाने परजिल्ह्यात जाण्याची परवानगी दिली आहे. यात प्रामुख्याने वैद्यकीय व निधनाच्या कारणामुळे परजिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही व्यक्तींना मुंबई, पुणे या शहरातही जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

तर शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्याअंतर्गत जाण्यासाठीही परवानगी बंधनकारक आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिस प्रशासनाने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एक हजार ८२५  व्यक्तींसह वाहनांना परवाना स्टिकर्स दिले आहेत. परिणामी जिल्ह्यातील प्रत्येक चेकपोस्टवर परवाना तपासल्यानंतर वाहनांना सोडले जात आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून रस्त्यांवरील गर्दीही कमी झाल्याचे चित्र आहे.

परतलेल्यांची आरोग्य तपासणी गरजेची

पोलिस प्रशासनाकडून परजिल्ह्यात जाण्याची परवानगी दिली जाते. मात्र, जिल्ह्यात परत आल्यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. परजिल्ह्यात गेलेल्या नागरिकांचा डेटा पोलिस प्रशासनाकडे उपलब्ध असल्याने त्यांची आरोग्य तपासणी होणे शक्य आहे.

तीन हजार २०९ ऑनलाइन अर्ज 

पोलिस प्रशासनाकडे आतापर्यंत तीन हजार २०९ ऑनलाइन परवानगी अर्ज दाखल झाले आहेत. त्यांपैकी एक हजार ४५९ परवानगी अर्जांचे कारण ठोस नसल्याने त्यांना पोलिसांकडून परवाना नाकारण्यात आली आहे. हे परवाने पोलिस ठाणेस्तरावरून दिले जातात.  या अर्जांचा सर्व डेटा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कोरोना मदत कक्षात येतो. 

अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना परजिल्ह्यात जाण्याची पोलिस प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. परजिल्ह्यात गेलेले नागरिक जिल्ह्यात परत आल्यानंतर 
त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाला कळविण्यात येणार आहे. 
- चैतन्य एस., 
पोलिस अधीक्षक, जालना.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com