खामसवाडी (जि. उस्मानाबाद) : ऐन लग्नसराईत जरबेरा फुलाला तेजीचा भाव येण्याच्या हंगामातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. फुलांना मागणीचे नसल्यामुळे संबंधित जरबेरा उत्पादक शेतकरी दररोज लाखो रुपयांची फुले तोडून फेकून देत आहेत. काही शेतकरी कटरच्या साह्याने त्याचे तुकडे करून खत म्हणून वापर करीत आहे.
खामसवाडी (जि. उस्मानाबाद) येथे पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलांचे उत्पादन घेणारे जवळपास २२ शेतकरी आहेत. अनेकांचे दहा गुंठ्यापासून तीस गुंठ्यापर्यंत जरबेराचे पॉलिहाऊस आहेत. दरवर्षी लग्नसराईत १५ मार्चपासून जरबेरा फुलांना चांगला भाव येतो. दोन रुपयांपासून १२ रुपयांपर्यंत प्रतिफुलाला या कालावधीत दर मिळतो. या दोन महिन्यांतच जरबेराचे मुबलक पैसे शेतकऱ्यांना मिळत असतात. नेमके याच काळात जगासह भारतात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे फुलाची मागणी बंद झाली आहे.
हेही वाचा : चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापूर
व्यापारीही फुले घेण्यास तयार नाहीत. त्यातच वाहतूक बंद आहे. लग्नसराई थांबली आहे. परिणामी त्याचा फटका फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. वर्षभरात मार्च, एप्रिल महिन्यात असलेल्या लग्नसराईमध्ये विविध शहरांतून या फुलाला मागणी असते. त्यामुळे यंदा बऱ्यापैकी पैसे मिळतील, अशी अपेक्षा हे फुल उत्पादक शेतकरी बाळगून होते. मात्र कोरोना विषाणूमुळे दिमाखात होणार विवाहसोहळे थांबले आहेत. परिणामी जरबेरा फुलांना मागणी नाही.
कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वच ठिकाणचे व्यवहार ठप्प झाल्यासारखी परिस्थिती आहे. मोठ्या शहरांकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पॉलिहाऊस उभा करून जरबेरा फुलशेती केली आहे. त्यासाठी मोठी मेहनत या फुलउत्पादक शेतकऱ्यांनी घेतली आहे. परंतु ऐन हंगामातच फुलांना कोठूनही कसलीच मागणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद
खामसवाडी गावातून दररोज शंभर बॉक्स जरबेरा फुले विविध ठिकाणच्या शहरात विक्रीसाठी पाठवली जात होती. एका बॉक्स मध्ये पाचशे फुले असतात. त्याचे किमान दोन रुपये प्रतिफुलाप्रमाणे दर धरला तर दररोज एक लाख रुपयांच्या फुलांची विक्री येथून व्हायची. मात्र आता फुलांना मागणीच नसल्यामुळे येथील शेतकरी ही फुले तोडून फेकून देत आहेत.
या कालावधीत जरबेरा फुलांचे भाव तेजीत असतात. १० ते १२ रुपयांपर्यंत एका फुलाला भाव मिळाला असता. त्यातूचन शेतकऱ्यांना उभारी मिळाली असती. शिवाय पॉलिहाऊससाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा काही कमी झाला असता. परंतु कोरोना विषाणूमुळे ऐन लग्नसराईत जरबेरापासून मिळणारे तीन ते चार लाख रूपयांना प्रत्येक शेतकऱ्याला मुकावे लागणार असल्याची खंत शेतकरी अनंत चव्हाण यांनी व्यक्त केली.
ऐन हंगामाताच जरबेरा फुलांना मागणी नाही. त्यामुळे खामसवाडीत येथील जरबेरा उत्पादक शेतकरी दररोज एक लाख रुपयांची फुले तोडुन टाकून देत आहेत.
- अमोल रोहिल, शेतकरी, खामसवाडी.जरबेरा फुलांची भाव वाढ होऊनही कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांना मागणी नाही. त्यामुळे कटरच्या साह्याने जरबेरा फुलाचे तुकडे करून त्याचा खत म्हणून उकिरड्यात फेकत आहे.
- शरद शेळके, शेतकरी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.