हिंगोली : जिल्ह्यातील एकूण खरीप हंगाम लागवडीलायक क्षेत्रापैकी तीन लाख ७८ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन दोन लाख ५५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर, तर तूर ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे यांनी दिली.
या वर्षी मान्सून वेळेवर दाखल होत होणार अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळातही खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. पेरणीसाठी लागणारे बियाणे, खताची शेतकरी जमवाजमव करीत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे.
हेही वाचा - हिंगोलीत हळद अडीच हजारांनी उतरली
तूर पिकाची ५२ हजार ५०० हेक्टरवर पेरणी अपेक्षीत
जिल्ह्यातील एकूण खरीप हंगाम लागवडीलायक क्षेत्रापैकी तीन लाख ७८ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. यात सोयाबीन दोन लाख ५५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर, तूर ५२ हजार ५०० हेक्टर, कपासी ४५ हजार हेक्टर, तृणधान्य सात हजार ९५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
३८ हजार ४५१ हेक्टर क्षेत्रावर हळद
तसेच कडधान्य ७० हजार ३३३ हेक्टर व गळीत धान्याची दोन लाख ५५ हजार ६६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणे अपेक्षित असल्याचे श्री. कानवडे यांनी सांगितले. तसेच हळद पीक नगदी पीक म्हणून समोर येत असून या वर्षी ३८ हजार ४५१ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
कापूस बियाणाची अडीच लाख पाकिटे उपलब्ध
जिल्ह्यात सोयाबीनच्या प्रस्तावित क्षेत्राकरिता एकूण एक लाख ६६ हजार क्विंटल बियाणाची अवश्यकता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खासगी कंपन्या तसेच शेतकऱ्यांकडील बियाणे आदी माध्यमांतून बियाणे उपलब्ध होणार आहे. कापसाच्या प्रस्तावित क्षेत्राकरिता विविध कंपन्यांचे दोन लाख ५५ हजार बीटी कापूस बियाणाची पाकिटे उपलब्ध आहेत. तसेच ज्वारी, मूग, उडीद, मका आदी पिकांची बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे श्री. कानवडे म्हणाले.
येथे क्लिक करा - संतापजनक : क्वारंटाइन गरोदर मातेसह मजुरांना मारहाण
६२ हजार २३० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर
जिल्ह्याला खरीप हंगामासाठी एकूण ६५ हजार २३० मेट्रिक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर झाले आहे. ९० हजार मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी विभागाची आहे. आतापर्यंत १७ हजार ८०० मेट्रिक टन खत मिळाला आहे. यातील दहा हजार मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. युरिया २४ हजार मेट्रिक टन, २०-२०-०-१३ हे खत २६ हजार मेट्रिक टन ; तर १४ हजार मेट्रिक टन डीएपी खत येत्या दोन ते चार दिवसांत उपलब्ध होणार असल्याचे श्री. कानवडे यांनी सांगितले.
बोगस बियाणे निघाल्यास तक्रारी द्या
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मिळेल त्या कंपनीचा खत खरेदी करून पेरणी करावी. याच कंपनीचे खत मिळावे, यासाठी हट्टाहास धरू नये. कंपन्या वेगळ्या असल्या तरी गुणवत्ता सारखी असते. बोगस बियाणे निघाल्यास तक्रारी द्या. संबंधितांवर कारवाई करू.
- निलेश कानवडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.