बाजार समित्यामधील व्यवहार सुरु होणार

बाजार समित्यामधील व्यवहार सुरु होणार

नांदेड : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी लोकांची गर्दी होवू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील धान्य खरेदी बंद केली होती. परंतु शहरात अन्नधान्याचा तुटवडा पडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यामधील व्यवहार हळू-हळू सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शनिवारी (ता. २८) दिले.

डीडीआर, बाजार समित्यांचे सचिव उपस्थित
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव, अडते, खरेदीदार यांची बैठक श्री विपीन यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा उपनिबंधक सहकारी (संस्था) प्रविण फडणीस, नांदेड बाजार समितीचे सचिव डी. ए. संगेकर, धर्माबादचे सी. डी. पाटील, भोकरचे श्री पुंजेकर, लोहाचे श्री घोरबांड, कंधारचे श्री वंजे, नायगावचे कदम यांच्यासह बिलोली, कुंडलवाडी, देगलूर अशा दहा ते बारा बाजार समित्यांचे सचिव उपस्थित होते. 

अन्नधान्याच्या साठ्यावर लक्ष्य
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शहरातील किराणा दुकानादारांच्या बैठकीत भुसार मालाच्या साठ्याची माहिती घेतली असता, चार - आठ दिवसाचा माल शिल्लक असल्याचे व्यापाऱ्यांनी त्यांना सांगीतले. यामुळे शहरासह जिल्ह्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होवू नये यासाठी भुसार माल बाजार समित्यांमध्ये येणे गरजेचे होते. यामुळे शनिवारी जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत सर्व बाजार समिती सचिवांची बैठक घेतली. 

खरेदीसंदर्भात दिशानिर्देश जारी
बाजार समित्यांनी गर्दी टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करुन हळू-हळू शेतीमाल खरेदीला सुरवात करावी. शेतीमाल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समित्यांनी सुविधा पुरवाव्या. हात धूण्यासाठी पाणी तसेच साबणाची व्यवस्था करावी, बाजार समितीचे एकच प्रवेशव्दार उघडून ठराविक शेतकऱ्यांना प्रवेश द्यावा, मुख्य ठिकाणी माहिती असलेले बॅनर लावावे, बाजार समिती आवारात स्वच्छता राखावी, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिल्या. 

मजूर, कामगारांच्या जेवणाची व्यवस्था
शहरातील मजूर, कामगार, भिक्षा मागून उदरनिर्वाह करणार्‍यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत असून यापुढेही करण्यात येणार आहे. गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी केले आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावापासून नांदेड जिल्हा दुर असला तरी संचारबंदीमुळे गोरगरीब, भिक्षा मागून खाणाऱ्यावर उपासमारीची वेळ येत आहे. या लोकांना अन्नधान्य वाटप सुरु आहे. ज्या लोकांना मदत करावयाची आहे त्यांनी देखील संपर्क साधावा. मागेल त्यास डब्बा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी अभिषेक सौदे, दिपक पावडे, कुणाल गजभारे, संदिप जाधव, शंकर वानेगावकर, अजय नरवाडे, संदिप कऱ्हाळे आदी सहकार्य करत आहेत. गरजू लोकांनी संयोजक कुणाल गजभारे यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन प्रविण साले यांनी केले आहे.       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com