नियम शिथिलीकरणानंतर मुरूड समुद्रकिनारा बहरला; व्यावसायिकांमध्ये समाधान

मुरूड समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची गजबज पुन्हा सुरू झाली आहे.
मुरूड समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची गजबज पुन्हा सुरू झाली आहे.

मुरूड : सहा महिने पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे खीळ बसली होती. मात्र, सरकारने उठवलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा पर्यटन व्यवसाय बहरू लागला आहे. गांधी जयंतीला जोडून सुट्ट्या आल्याने प्रथमच शनिवार, रविवारी मुरूड किनाऱ्यावर पर्यटकांची चहेल-पहेल दिसून आली. अनलॉक 5 चा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने आगामी काळात पर्यटन व्यवसायाला झळाळी मिळेल, अशी उमेद हॉटेल, लॉजमालकांमध्ये दिसून येत आहे. 

कोरोना महामारीमुळे ऐन हंगामात मार्चअखेरीस सरकारने बंदी आणल्याने पर्यटन व्यवसायात झपाट्याने घसरण सुरू झाली. याच दरम्यान जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात मुरूड समुद्रकिनारी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याने उरलेसुरलेले अवसानही गळून पडले. समुद्रकिनारी असलेले टपरीधारक अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

अनलॉकनंतरही त्यात पर्यटनबंदी लागू होती. त्यामुळे व्यावसायिक दुहेरी संकटात सापडले होते. मात्र, सरकारने पर्यटनावरील बंदी हटवल्याने पुन्हा एकदा पर्यटन बहरण्यास सुरुवात झाली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर गजबजाट सुरू झाला आहे. ऑक्‍टोबरच्या सुरुवातीलाच लागून सुट्ट्या आल्याने संधीचे सोने करण्यासाठी लॉकडाऊनला कंटाळलेले पर्यटक समुद्रकिनारी आनंद लुटताना दिसत होते. पर्यटकांसह व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच आनंद झळकून येत आहे. दरम्यान, ऐतिहासिक जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी खुला केल्यास मुरूडमध्ये निश्‍चितपणे स्थानिकांचा रोजगार वाढेल. 

खवय्यांसाठी पर्वणी 
सध्या पॉपलेट, सुरमई, हलवा, कोलंबी, रावस आदी चांगल्या प्रतीच्या मासळीची आवक वाढल्याने खवय्यांसाठी पर्वणी आहे. येथील निसर्गसौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडतेच; परंतु इथल्या ताज्या मिळणाऱ्या मासळीचे पर्यटकांना विशेष आकर्षण वाटते. कोकणी पद्धतीच्या घरगुती जेवणाची लज्जत काही औरच असते. त्यामुळे कामात बदल म्हणजे विश्रांती अशी धारणा असलेल्या मुंबई, पुणे इथल्या नवयुवकांची विशेष पसंती या पर्यटनस्थळाला पहावयास मिळते. 

किनाऱ्यावरील गर्दी
समुद्रकिनारी वडापाव, पाणीपुरी, भेलपुरी, चहानाश्‍ता आदी स्टॉलधारकांनी जोमात आपले काम सुरू केले आहे. तर समुद्रात भरती-ओहोटीच्या लाटांवर स्वार होत असताना घोडागाडी, घोडेस्वारीसाठी हौशी पर्यटक आनंद लुटत आहेत. 

मुरूडची खाद्यसंस्कृती पर्यटकांना विशेषतः भावते. प्रदूषणमुक्त वातावरण, स्वच्छ समुद्रकिनारा, निसर्गप्रेमी पर्यटकांना निश्‍चितपणे पसंत पडतो. कोव्हिडचे भय जसजसे कमी होईल, तसतशी पर्यटकांची संख्या वाढेल. 
- शुऐब मलिक, मुरूड मरिनाचे मालक 


(संपादन : उमा शिंदे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com