आंबा, काजूवर खराब हवामानाचे शुक्‍लकाष्ठ 

संग्रहित
संग्रहित

पाली : रायगड जिल्ह्यात 14 ते 15 हजार हेक्‍टर आंब्याचे क्षेत्र आहे. हेक्‍टरी एक ते दीड टन आंब्याचे उत्पादन येते. काजूचे पीक 4 ते 5 हजार हेक्‍टरवर घेतले जाते. योग्य मशागत, खबरदारी व काळजी आणि हवामानाने चांगली साथ दिल्यास आंबा बागायतदारांच्या हाती चांगले उत्पादन लागते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, उशिरा दाखल झालेली थंडी अशा वातावरणातील बदलाचा आंबा व काजू पिकावर विपरीत परिणाम होत आहे. बागांमध्ये वर्षभर केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न हाती लागण्याची शक्‍यता कमी असल्याने बागायतदार चिंतेत सापडला आहे.

जिल्ह्यात यंदा मुसळधार, परतीच्या व अवकाळी पावसाने शेतकऱ्याची दैना उडवली. हजारो हेक्‍टरवरील भात, वरी व नाचणीचे पीक अक्षरशः पाण्याखाली गेले. अवकाळी पाऊस व उशिरा दाखल झालेली थंडी अशा वातावरणातील बदलाचा आता आंबा व काजू पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. सर्वसाधारणपणे नोव्हेंबरमध्ये येणारी थंडी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दाखल झाली आहे. या खराब हवामानामुळे येथील आंबा व काजू उत्पादक बागायतदार धास्तावले आहेत.

योग्य मशागत, खबरदारी व काळजी आणि हवामानाने चांगली साथ दिल्यास आंबा बागायतदारांच्या हाती चांगले उत्पादन लागते. आंबा स्थानिक बाजारपेठेत विकून व त्याची निर्यात करून त्यांना चांगला पैसेदेखील मिळतो. मात्र अनियमित व खराब हवामानामुळे यंदा जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन कमालीचे घटण्याची शक्‍यता आहे. दोन महिन्यांपासून जिल्ह्यात फारशी थंडी पडली नाही. बरेच दिवस वातावरण उष्ण होते. त्यामुळे पुरेशा थंडीअभावी अजूनही आंब्याला मोहोर आलेला नाही.

जानेवारीत बहुतांश आंब्यांना बारीक आंबेदेखील लागतात. मात्र जानेवारीचा पहिला आठवडा उलटला तरी अजूनही बहुतांश आंब्यांना मोहोरच नाही. आता थंडीदेखील दाखल झाली आहे. मात्र तरीही उशिरा आलेल्या थंडीत आंबा, काजूला मोहोर तरी किती येणार? हा प्रश्‍न कायम आहे. या परिस्थितीत आंबा व काजूच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. तसेच आंबा आणि काजूच्या उत्पादनाचा दर्जादेखील घसरण्याची शक्‍यता आहे.

विमा सुरक्षेची गरज 
आंबा व काजूच्या बागा या जिल्ह्याची विशेष ओळख आहे. याशिवाय अनेकांच्या परसबागेत तसेच जंगलातदेखील आंबा व काजूची झाडे विपुल प्रमाणात आहेत. या झाडांवरील कैऱ्या, आंबे, काजूगर व काजू काढून ते स्थानिक बाजारात विकून अनेक आदिवासी उदरनिर्वाह चालवतात. आंबा व काजूचा हंगाम म्हणजे त्यांच्या उत्पन्नात थोडी भर पडण्याचा कालखंड असतो. मात्र खराब हवामानामुळे आंबा आणि काजूचे पीक कमी झाले किंवा दर्जा घसरला तर या आदिवासींवर देखील उपासमारीची वेळ येण्याची शक्‍यता आहे. अनेक छोटे-मोठे विक्रेतेदेखील वाऱ्यावर येण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने विशेष योजना किंवा विमा सुरक्षा देऊन त्यांना तारण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com