मोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी

मोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी

मुंबई - अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९च्या मध्यामध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सरकार स्थापनसेसंदर्भात फोन केला होता. यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या ठरलेल्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ ते ३८ आमदारांशी आधीच चर्चा केली होती. या सर्वांनी अजित पवारांना होकारार्थी उत्तर देखील दिलं होतं. भाजपाकडे स्वतःचे १०५ आमदार तर साधारण १५ अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा होता. भाजपाला मॅजिक फिगर गाठण्यासाठी १४५ आमदारांची गरज होती. मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजपाला २५ ते ३० आमदार कमी पडत होते. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी काही क्रॉस ओव्हर आमदारांशी चर्चा करून आश्वासन दिलं होतं. सर्व आमदार मुंबईत दाखल झाल्यावर त्यांना दिल्ली किंवा हरियाणामध्ये हलवलं लोणार होतं. दरम्यानच्या काळात राज्यपालांकडून 'प्रो टेम' स्पीकरची नियुक्ती केली जाणार होती.    

विधानभवनाच्या स्पिकरसाठी एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास विधानभवन नियम ८, कलम १८० (१) अन्वये महाराष्ट्र विधानसभेतील प्रो टेम स्पिकरला गुप्त मतदान घेण्याची परवानगी आहे. महाराष्ट्र हे भारतातील एकमेव असे राज्य आहे जिथे ही गुप्त मतदान पद्धती कायम ठेवली गेलीये. फडणवीसांनी याच गोष्टीचा वापर करत दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचा निश्चय केला. जर गुप्त मतदान झालं तर कॉस ओव्हर वोटींगच्या साहाय्याने  सभापतींची निवडणूक होऊ शकते. त्याचसोबत एकदा स्पीकर निवड झाली की क्रॉस ओव्हर वोटिंग आणि गुप्त मतदान घेत बहुमत सिद्ध करणं भाजपाला  सोपं झालं असतं. अशात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  बहुमत सिद्ध करणे ही मोठी गोष्ट ठरणार नव्हती.

2014 मध्ये, देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत हे हात वरकरून होणाऱ्या निवडीनुसार सिद्ध केलं होतं. आवश्यकतेनुसार १४५ विरोधात भाजपाकडे १२२ आमदार होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभात्याग केला आणि शिवसेनेने गदारोळ केला मात्र भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखलं नाही २०१९ मध्ये देखील फडणवीसांनी याच पर्यायाचा वापर करण्याचं ठरवलं. राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याच्या त्यांच्या प्लॅनला दिल्लीतून देखील होकार आला होता. ३८ आमदारांना फोडून त्यातील २० जणांना मंत्रिपद किंवा राज्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं. इतर आमदारांना म्हाडा किंवा सिडको यासारख्या संस्थांची अध्यक्षपदे देण्याचं ठरलं होतं. 

महाविकास आघाडीची बैठक संपवून २२ नोव्हेंबर रोजी अजित पवार हे चर्चगेट मधील आपल्या निवासस्थानी आलेत. साधारण १०.३० वाजता अजित पवार पुन्हा घराबाहेर पडलेत. मध्येच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला कार थांबवायला सांगितली. आणि कार घेऊन घरी जाण्यास सांगितलं.  यानंतर दुसऱ्या गाडीत बसून अजित पवार निघालेत. इथे देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला गाड्यांचा ताफा सोडला. दुसऱ्या गाडीत बसून ते देखील पोहिचलेत BKC मधील सोफीटेल हॉटेलमध्ये. दोन्ही नेत्यांनी पंचतारांकित हॉटेलच्या मागील दरवाज्याने प्रवेश करणं पसंत केलं. मध्यरात्री दोन्ही नेत्यांमध्ये तासभर मिटिंग झाली. 

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा संभाव्य उमेदवार म्हणून निश्चित होत असल्याचं समजल्यावर फडणवीस पॅनिक  झालेत आणि त्यांनी अजित पवार यांना उद्याच म्हणजे २३ तारखेला शपथ घ्यावी लागेल असं सांगितलं. अजित पवारांनी फडणवीसांना राष्ट्रपती राजवट आणि इतर प्रक्रियेबद्दल विचारणा केली. अजित पवारांनी आपण घाई करू नये असं देखील सुचवलं. अजित पवारांनी फडणवीसांना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी होकार दिल्याचं सांगितलं, मात्र शेवटचा निर्णय होणं बाकी आहे हे देखील कळवलं. मात्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, लवकरात लवकर शपथ घेणं आणि नंतर पाहू म्हणणं राहिलं. 

दरम्यान, शरद पवार यांना भाजपशी हातमिळवणी करण्यात काहीही रस नव्हता. अजित पवार यांच्या निकटच्या एका व्यक्तीने लेखकाला दिलेल्या माहितीप्रमाणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून निश्चित होत असल्याचं अजित पवार याना समजलं होतं. यामार्फत अजित पवार यांना बाजूला ठेऊन सुप्रिया सुळे यांना नंतरच्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री करण्याचं ठरत असल्याचं समजलं. अजित पवारांसाठी हा मोठा शॉक होता. यामुळे आपलं राजकीय करिअर संपू शकतं असं अजित पवार यांना वाटत होतं.  

या सर्व बाबी पाहता अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करण्याचं ठरवलं. आणखीन वेळ घालवला तर शरद पवार फुटीर आमदारांना त्यांच्या भाषेत समजावून शांत करतील असं देखील सांगितलं. अशात शरद पवार यांना याची माहिती लागण्याआधी मोठा राजकीय भूकंप करण्याचं ठरवलं.   

नेहरू सेंटरमधील बैठकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. अशात महाविकास आघाडीकडून सत्तास्थापानेचा दावा करण्याआधी शपथ घेण्याचं इथे फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ठरलं. आणि म्हणूनच २३ नोव्हेंबर रोजी पहाटे फडणवीस आणि अजित पवार यांचा राजभवनात शपथविधी पार पडला. 

अजित पवार आणि त्यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे यांनी ३८ आमदारांना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर रात्री १२.३० वाजता बोलावलं. दरम्यान सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल पटेल यांना याबाबत माहिती देण्यात आली होती.  धनंजय मुंडे यांच्या मते भाजपशी हातमिळवणी योग्य नसल्याचं त्यांनी अजित पवारांना सांगितलं होतं, मात्र अजित पवार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे शरद पवारांसोबत राहायचं की राजकीय गुरु अजित पवारांसोबत जायचं असा प्रश्न पडला. धनंजय मुंडे रात्री आपल्या मित्राच्या घाटी कफ परेडला गेलेत. त्यांना रात्री ३ वाजेपर्यंत झोप लागत नव्हती. 

दरम्यान ठरलेल्या प्लॅनप्रमाणे धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आमदार जमण्यास सुरवात झाली. भाजप नेते प्रसाद लाड आणि पार्थ पवार यांच्याकडून या गोष्टींचं कोऑर्डिनेशन सुरु होतं. मुंबई विमानतळावर ७ प्रायव्हेट विमानं दिल्ली आणि हरियाणाला या आमदारांना घेऊन जाण्यास तयार ठेवण्यात आली होती. दरम्यान आपापले मतदारसंघ सोडताना आमदारांनी एकमेकांना फोन केलेत आणि मीटिंगबद्दल विचारपूस केली. त्यांना पुढे काय होणार आहे याची काहीही माहिती नव्हती. शरद पवारांच्या सांगण्यावरून अजित पवारांनी बैठक बोलावलीये असा त्यांचा समज होता. अशात काहींना अजित पवार यांनी स्वतः निर्णय घेतल्याचं समजताच त्यांनी यातून माघार देखील घेतली. त्यामुळे ३८ पैकी केवळ १५ आमदार मुंबईमध्ये आलेत.  

राज भवनात काहीतरी सुरु असल्यची माहिती शरद पवारांना मिळाली. माईक आणि स्पीकर सुरु ठेवण्यास तिथल्या इंजिनिअरला सांगितलं गेलं होतं. त्यामुळे राजभवनात कुणीतरी जागं आहे अशी माहिती समोर येत होती. अशात शरद पवारांच्या थेट संपर्कांत आमदारांनी शरद पवारांना अजित पवार यांनी आपल्याला मिटिंगसाठी बोलवलं असल्याचं सांगितलं. इथे शरद पवार यांना अजित पवार यांच्या प्लॅनबद्दल समाजात होतं. अनेक आमदारांनी अजित पवार यांनी बोलावलेल्या मीटिंगला न जाण्याचा निर्णय घेतल्याने  अजित पवार यांचा प्लॅन किती यशस्वी होईल याबाबत शरद पवार साशंक होते. यानंतर शनिवारी रात्री ३ वाजता अजित पवार यांच्यासोबत केवळ १५ आमदार असल्याचं शरद पवार याना समजलं. भाजप कडे १०५ आमदार, लहान पक्ष आणि अपक्ष मिळून १५ अधिक राष्ट्रवादीचे १५ मिळूनही १४५ ची मॅजिक फिगर होत नव्हती. त्यामुळे भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्या अजित पवारांचा प्लॅन यशस्वी होणार नाही आणि अजित पवार यांची विश्वासार्हता कमी होईल हे शरद पवार यांना ठाऊक होतं. एकीकडे राजभवनापासून जवळच असलेल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर शरद पवार रात्री ३ वाजता झोपी गेलेत तर तिथे राज भावनांवर फडणवीस यांच्या शपथविधीचा तयारी सुरु होती. 

दुरीकडे देवेंद्र फडणवीस जेव्हा शपथ घेणार होते. त्याआधी त्यांनी मिरची हवन केलं होतं असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातल्या नालखेडामधील बागलामुखी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून फडणवीसांनी हे हवन करुन घेतल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. उत्तरखंडमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी हरीश रावत सरकारही कोसळण्याच्या स्थितीत होतं. त्यावेळी हरीश रावत यांनी हे मिरची हवन केलं आणि त्यांचं सरकार हे हवन केल्यामुळे वाचलं असं फडणवीसांना कोणीतरी सांगितलं होतं. त्यानंतर जेव्हा महाराष्ट्रात सत्तास्थापनेची गणितं बदलली होती. भाजपमध्ये अस्वस्था निर्माण झाली. त्यावेळी भाजपचं सरकार वाचवण्यासाठी फडणवीसांनी सुद्धा मिरची हवन केलं होतं, असं पुस्तकात म्हटलं आहे. एवढंच काय तर मिरची हवन करणारा जो तांत्रिक आहे त्यानं फडणवीसांना शपथविधीच्यावेळी काळ्या रंगाचं जॅकेट घालण्यास सांगितलं होतं. त्यानुसार फडणवीसांनी आपलं आवडत्या निळ्या रंगाचं जॅकेट नाकारात काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं, हे देखील पुस्तकात नमूद केलं गेलं आहे.


अशात स्वतः मुख्य सचिव अजोय मेहता दिल्लीहून तात्काळ मुंबईत दाखल झालेत. त्यांनी तात्काळ राजभवन गाठलं. राज्यपालांचे सेक्रेटरी सचिन कुर्वे यांनी अजोय मेहता यांनी दिलेले पेपर्स घेतलेत. ताबडतोब राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केली. यानंतर राज्यपालांच्या सांगण्यावरून भाजपाकडे १०५ आमदार आणि राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांचा पाठिंबा म्हणजे एकूण १५९ आमदार होत असल्याचा एक ईमेल लिहिण्यास सांगितलं. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट लवकरात लवकर उठवली जावी यासाठीच्या हालचाली सुरु झाल्यात. दरम्यान सर्व कागदपत्र दिल्लीत PMO ऑफिसला पाठवण्यात आलीत. त्यानंतर PMO ऑफिसने विशेषाधिकाराचा उपयोग करून महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवली जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राष्ट्रपती भवनाला कळवण्यात आला. यानंतर राष्ट्रपती भवनावरून महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली.  याबाबत केंद्रीय गृह विभागाला कळवण्यात आलं. यानंतर केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी सकाळी ५ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी  याबाबत गॅझेट निटिफिकेशन काढलं. 

दरम्यान २२ तारखेला उशिरा रात्री फडणवीसांनी गिरीश महाजन आणि भाजाप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना सकाळी नागपुरी पोहे आणि शिरा खाण्यासाठी वर्षा बंगल्यावर बोलावलं. सकाळी दोन्ही नेते वर्षावर पोहोचलेत. फडणवीसांनी तुमच्यासाठी सरप्राईज यअसल्याचं दोघांना सांगितलं. पोहे आणि शिरा खाऊन झाल्यानंतर फडणवीस दोघांना थेट राज भवनांवर घेऊन गेलेत. तिथे अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि श्रीनिवास पवार हजर होते. त्यांना पाहून चंद्रकांत पाटील आणि गिरीष महाजन यांना आनंदाचा धक्का बसला.  दोन्ही नेत्यांमध्ये काहीतरी घडतंय असं त्यांना ठाऊक होतं मात्र इतक्या लवकर घडामोडी होतील असं त्यांना वाटलं नव्हतं.    

अजित पवार यांनी नरहरी झिरवाळ यांना राज भवनांवर बोलवलं होतं. तिथे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांना पाहून झिलवळ यांना धक्का पोहोचला. अशात फडणवीस आणि भाजप नेते शेतकरी प्रश्नावरून राज्यपालांची भेट घेत असतील असा समज झिरवळ यांचा झाला. मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत याबाबत काहीच कल्पना नसल्याचं झिरवळ यांनी लेखकाला सांगितलं.

राज भवनावर घाई गडबडीत सर्व गोष्टी घडत होत्या. एकमेकांकडे पाहून कसं वागावं हे कुणालाही समाजत नव्हतं. फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर त्यांना सर्वांना कारमध्ये बसण्यास सांगण्यात आलं. मी काही सामान घेऊन गेलो नसल्याचं त्यांना सांगितलं, माझ्याकडे कपडे नसल्याचं देखील सांगितलं. मात्र नवीन कपडे विकत घेऊन दिले जाती असं मला सांगण्यात आल्याचं झिरवळ यांनी लेखकाला सांगितलं. यानंतर कडेकोट बंदोबस्तात त्यांना मुंबई विमानतळावर घेऊन जाण्यात आलं.      

शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.५० वाजता फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्र मोठा राजकीय भूकंप आला.  

checkmate book reviles secret about devendra fadanavis and ajit pawars early morning oath 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com