मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीकर माघारी; चाकरमान्यांचा घराच्या दिशेने प्रवास

मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीकर माघारी; चाकरमान्यांचा घराच्या दिशेने प्रवास

ठाणे - रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाल्याचा परिणाम उपनगरांतही दिसून आला. ठाणेच्या पुढे मुंबई दिशेला लोकल जात नसल्याने कल्याण डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी पुन्हा घरचा रस्ता धरला. काही कर्मचाऱ्यांनी रस्ते वाहतूक मार्गे कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला. परंतू मुंबईतील ईस्टन एक्सप्रेस हायवेवरच वाहने अडकल्याने त्यांनाही माघारी फिरण्यापलीकडे काहीही पर्याय नव्हता. वाहतूक कोंडीतच प्रवाशांचे सहा ते आठ तास गेल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. 

मुंबईत झालेल्या पावसाचा फटका कल्याण डोंबिवलीकरांना बसला. बुधवारी शहरात पावसाचा जोर फारसा नसल्याने नेहमीप्रमाणे चाकरमान्यांनी सकाळी 5 लाच घर सोडण्यास सुरुवात केली. रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांना मुंबई दिशेला पाऊस झाल्याने ठाणे पुढे लोकलसेवा ठप्प असल्याची माहिती मिळाली. परिणामी अनेक नागरिकांनी रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडून बसने मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला. परंतू मुंबईतील रस्त्यांवरही पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वाहने तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्याने अखेर काही कार्यालयांच्या वरिष्ठांनीच कर्मचाऱ्यांना माघारी फिरण्याच्या सूचना केल्या. परंतू तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी अर्ध्याहून अधिक अंतर पार केले असल्याने तेथून माघारी फिरून पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार या कारणामुळे चाकरमान्यांची चिडचिड झाली. सकाळी 8 च्या दरम्यान अनेकांना लोकलसेवा व रस्ते वाहतूक सेवाही ठप्प असल्याची माहिती मिळाल्याने अनेकांनी घर न सोडण्याचाच निर्णय घेतला. यामुळे डोंबिवली एसटी बसथांब्यावरही ठराविक चाकरमान्यांचीच वरदळ दिसून आली. दुपारी एक नंतरतर प्रथमच शहरात प्रवाशांअभावी मुंबईला जाणाऱ्या एसटी रिकाम्या उभ्या असल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

कल्याण डोंबिवली पाऊस नसल्याने मुंबईत जास्त पाऊस झाला असेल याचा आम्हाला अंदाज आला नाही. त्यामुळे सकाळी लवकर आवरुन आम्ही 5 लाच घर सोडले. त्यानंतर अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक कोंडी व पावसाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यााने आम्ही कार्यालयातील वरिष्ठांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. परंतू सुरुवातीला त्यांनी काहीच रिस्पॉन्स न दिल्याने आम्ही प्रवास सुरुच ठेवला. अखेर 10 च्या सुमारास आम्हाला वरीष्ठांनी सुट्टी असल्याचे जाहीर करीत माधारी जाण्यास सांगितले. परंतू मुंबईत आम्ही पोहोचलो असल्याने पुन्हा माघारी फिरुन घरी येण्यास आम्हाला तब्बल दहा तास लागले. परिस्थितीचा अंदाज घेऊन आधीच प्रशासनाने नागरिकांना सूचना केल्या असत्या तर त्यांचा वेळ असा प्रवासात वाया गेला नसता अशी संतप्त प्रतिक्रीया यावेळी चाकरमान्यांनी व्यक्त केली.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com