कोरोनाच्या काळात तुम्हाला सतत भीती वाटतेय? तर सावधान; वाचा काय सांगतायत डॉक्टर...  

कोरोनाच्या काळात तुम्हाला सतत भीती वाटतेय? तर सावधान; वाचा काय सांगतायत डॉक्टर...  

मुंबई : कोरोनाने गेली चार-पाच महिने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण केली. सुरुवातीला तर कोरोनाच्या भीतीने अनेकांना मानसिक आजारांनाही सामोरे जावे लागल्याचे उदाहरणे समोर आली. जीवघेणी भीती, आक्रस्ताळेपणा आणि सतत दबावात राहिल्याने हृदयविकार तक्रारी वाढत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे ह्रदयविकाराचा त्रास वाढण्याची भीती असून मानसिक स्वास्थ्यही धोक्यात येत असून त्याबाबत काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कोरोना विषाणूच्या संकटाने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथ म्हणून घोषित केले. भारतात या संसर्गजन्य विषाणूचा प्रवेश आणि प्रसार चीन, इटली युरोप आणि अमेरिका यांच्या तुलनेत उशिरा आणि संथ झाला असला तरीही वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात हा संसर्गजन्य रोग अनेक मानवी आपत्तीस कारणीभूत ठरू शकतो.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च ते जून महिन्यात सरकारतर्फे लॉकडाऊन केले गेले. त्यामुळे लाखो नागरिकांच्या नोकरी-धंद्यावर गदा आली. भारतातील प्रत्येक नागरिकाला याची झळ बसली असून अनेक नागरिक निराशेच्या गर्तेत जाताना दिसत आहेत. परंतु या संकट काळात प्रत्येक नागरिकाने आपल्या मानसिक व शारिरीक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यासाठी तणावाचे नियोजन करणे खूप महत्वाचे आहे. कोरोना संकटात लॉकडाऊनमुळे क्रयशक्ती म्हणजेच शरीराची हालचाल मंदावली आहे.

तसेच चुकीच्या आहारपद्धतीमुळे उच्च रक्तदाब व मधुमेह वाढण्याची दाट शक्यता आहे; म्हणूनच निदान कोरोनाचे संकट जाईपर्यंत चिडचिडेपणा, घरातल्या व्यक्तींवर रागावणे, उदासीनतेची भावना वाढविणे , भविष्यात काय होणार याची चिंता करणे, कमी झोप घेणे, अनावश्यकरित्या आक्रमक होणे म्हणजेच आक्रस्ताळेपणा करणे यापासून दूर राहणे महत्वाचे आहे, असे शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर सांगतात.

कोरोनाच्यापूर्वीही अनेक नागरिक तणावग्रस्त होते परंतु हिंडण्या-फिरण्याची बंधने नसल्यामुळे आपल्या मित्रांशी अथवा नातेवाईकांशी भेटून व बोलून काही प्रमाणात का होईना हा तणाव दूर होत होता, परंतु कोरोना संकटात आपण सर्वजण एकाच ठिकाणी अडकले आहेत. म्हणूनच आपले मानसिक स्वास्थ जपणे अत्यंत महत्वाचे आहे. मानसिक तणाव एका पातळीनंतर पुढे गेल्यावर तळहातांना घाम येणे, तोंड कोरडे पडणे, अनियमित श्वासोच्छवास होणे, स्नायू ताणले जाणे, मांसपेशी, हात-पाय थंड पडणे, पोटात गोळा उठणे, थरथर वाटणे, वारंवार लघवी होणे, हातापायांची जलद जलद हालचाल करणे, अशी लक्षणे आढळतात. अशावेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे, असेही तारळेकर सांगतात. 

कोरोनाचे संकट हे काही दिवसापुरते आहे, ही भावना प्रत्येक नागरिकाने जोपासली पाहिजे. तसेच मानसिक तणाव आल्यावर मोबाईल अथवा टीव्हीवर विनोदी चित्रपट पाहणे, आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी फोनवर बोलणे, कुटुंबीयांसोबत हास्यविनोद करणे ही काळाची गरज आहे. मात्र, टीव्हीवरील नकारात्मक गोष्टी पाहणे टाळायला हव्यात, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात. लॉकडाऊनच्या काळात सतत सोबत राहिल्याने काही मतभेद किंवा चिडचिड होण्याचा संभव असतो. मात्र त्यावर मात करण्यासाठी दिवसातील कमीतकमी 3 तासांचा वेळ स्वतःसाठी देणे महत्वाचे आहे. याकाळात आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीत रमणे आवश्यक असल्याचे ही मुंदडा सांगतात. आपल्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्याकडे ही लक्ष देणा महत्वाचे असून बाहेर शक्य नसल्यास घरातल्या घरात जॉगिंग करण्याचा सल्लाही मुंदडा देतात.
----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com