नवी दिल्ली : मार्च महिन्यात मुंबईतील शिवाजी पार्कवर विरोधकांच्या एकजुटीनंतर पुन्हा राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक रामलिला मैदानावर सर्व विरोधी नेते एकत्र येत असून मोदी सरकारच्या विरोधातील हा ‘शंखनाद’ ठरणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांचे नेते पहिल्यांदा एकत्र येत असल्याने या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर ही पहिल्यांदाच सभा होत असली तरी एका व्यक्तीच्या सुटकेसाठी ही सभा होत नसल्याचे काँग्रेसने आज स्पष्ट केले. नरेंद्र मोदी काळात गेल्या दहा वर्षात लोकशाही व राज्यघटनेवर अत्यंत नियोजन पद्धतीने हल्ले होत आहे. न्याय मागण्यांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहे. मोदी सरकारला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून अटक केली जात आहे. कोणतेही पुरावे नसताना झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. देशातील बेरोजगारी उच्चांकी पातळीवर पोचली आहे. निवडणूक रोख्यांमधून ‘चंदा दो, धंदा लो’ हा उपक्रम राबवून भाजपने मोठ्या कंपन्यांकडून वसुली केली आहे. या सर्व मुद्यांना घेत ‘लोकशाही वाचवा रॅली’ आयोजित केली आहे, असे काँग्रेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
तृणमूलची हजेरी राहणार
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर ‘आप’ने पुढाकार घेऊन ही सभा आयोजित केली तरी ‘इंडिया’ आघाडीतील २८ पक्षांचे नेते उद्या उपस्थित राहणार आहे. ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते खासदार डेरेक ओब्रायन सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, माकपचे नेते सीताराम येचुरी, डी. राजा, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, दीपांकर भट्टाचार्य, राष्ट्रीय लोक दलाचे सुनील सिंग याशिवाय ‘आप’च्या नेत्या आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज, गोपाल राय आदी उपस्थित राहणार आहेत.
विक्रमी गर्दीचा दावा
निवडणुकीच्या रणधुमाळीत दिल्लीत होणाऱ्या या सभेला कसा प्रतिसाद मिळतो, याकडेही लक्ष लागले आहे. दिल्लीतील ऐतिहासिक रामलिला मैदानात विक्रमी गर्दी होईल, असा दावा काँग्रेसचे नेते खासदार जयराम रमेश व आपचे दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष गोपाल राय यांनी केला आहे.
भाजपविरुद्ध मानहानीचा दावा करा :खेडा
नवी दिल्ली :एअर इंडियासाठी विमाने खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून सीबीआयने तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे आता मागे घेतले आहे. काही वर्षांपूर्वी भाजपने केलेले आरोप खोटे होते, हे सिद्ध झाले असून पटेल यांनी भाजपच्या विरोधात मानहानीचा दावा करावा, असा सल्ला काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच सीबीआयने प्रफुल्ल पटेल यांची चौकशी थांबविली आहे.
हेमामालिनींच्या विरोधात विजेंदरसिंह?
नवी दिल्ली : मथुरा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार हेमामालिनी यांच्याविरोधात मुष्टियोद्धा विजेंदर सिंह यांना काँग्रेसकडून उतरविण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघात ‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यावी, यावर काँग्रेसमध्ये मंथन सुरू होते. मुष्टियोद्धा विजेंदरसिंह यांच्या नावावर काँग्रेसमध्ये एकमत झाल्याचे समजते. या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.