

Flooded railway tracks, overhead wire issues, and landslides severely affected Western, Central, and Harbour railway operations across Mumbai.
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबई, पालघर आणि सह्याद्री घाट परिसरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली. पश्चिम रेल्वेवर वसई रोड-विरारदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सकाळी सुमारे ९ वाजता लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. रात्री ८ वाजेपर्यंतही ही सेवा पूर्ववत झाली नव्हती. त्यामुळे तब्बल ११ तासांहून अधिक काळ वसई-विरारदरम्यानची लोकल सेवा ठप्प राहिली. चर्चगेट ते वसई रोडदरम्यान लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटांच्या विलंबाने धावत होत्या. त्याचवेळी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ओव्हरहेड वायरवर प्लास्टिक अडकल्याने, हार्बर मार्गावर झाडाची फांदी पडल्याने आणि कर्जत-खोपोली मार्गावरील रुळाखालची खडी वाहून गेल्याने तिन्ही उपनगरी मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी लाखो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.