वातावरण बदलासोबतच मुंबईकरांची चिंता वाढली; सर्दी, तापाचे रुग्णांच्या संख्येत वाढ....

वातावरण बदलासोबतच मुंबईकरांची चिंता वाढली; सर्दी, तापाचे रुग्णांच्या संख्येत वाढ....

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे आल्हाददायक वातावरम मिळाले. मात्र दोन-तीन दिवस पाऊस, दोन-तीन दिवस ऊनामुळे वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे. त्यामुळे या वातावरण बदलाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.सकाळी पडणारा पाऊस दुपारी ऊन आणि पुन्हा संध्याकाळी दाटून येणाऱ्या ढगांमधून कोसळणारा पाऊस या सर्व खेळामध्ये मुंबईकरांना ताप, सर्दी आणि खोकला होत आहे. सतत ताप येऊन डेंग्यू, स्वाईन फ्लू, लेप्टो, मलेरिया सारख्या मोठ्या आजारांचा ही सामना करावा लागतो.

सध्या कोरोना काळ सुरु असल्याकारणाने अनेक रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण, आता पालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये हळूहळू इतर आजारांवर ही उपचार सुरु झाले आहेत. पालिकेच्या केईएम रुग्णालयात या आजारांसाठी फिवर ओपिडी सुरु करण्यात आली आहे. जिथे पावसाळी आजारांवर उपचार केले जात आहेत.  केईएममध्ये 24 तास सुरु असलेल्या ओपीडीमध्ये आता गर्दी वाढू लागली आहे. काल एका दिवसात 100 हून अधिक रुग्ण वेगवगळ्या आजारांसाठी दाखल झाले होते. त्यात ताप, सर्दी, खोकला आणि श्वासाच्या संबंधित त्रास होत असलेले रुग्ण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. 

मंगळवारी ओपीडीत आलेल्या 102 रुग्णांपैकी 20 हून अधिक रुग्ण हे तापासोबत थंडी भरत असल्याच्या तक्रारी घेऊन उपचारांसाठी दाखल झाले होते. तर, 36 रुग्णांना श्वासासंबंधित समस्या होत असल्यामुळे त्यांना दाखल करुन घेतल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शिवाय, गेल्या आठवड्याभरात मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून लेप्टोही हळूहळू पाय पसरत आहे असे डॉ. दिपक मुंढे यांनी सांगितले. 

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यातून डेंग्यूच्या डासांची पैदास होते. त्यामुळे अशा ठिकाणी होणारी डासांची पैदास थांबवावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे, जर कोणत्याही प्रकारचा आजार जाणवत असेल तर घरगुती उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना पावसात भिजल्यामुळे, वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जास्त त्रास जाणवतो. खोकला तसेच घसादुखीचा त्रास होतो. सर्दी, खोकल्याच्या तसंच तापाच्या अनेक तक्रारी घेऊन मुंबईच्या पालिकेच्या हॉस्पिटलसह सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पण, आता लोक कोरोनाच्या भीतीने रुग्णालयात जायला ही घाबरतात. 

कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी धोका टळलेला नाही. सोबतच पावसाळ्यामुळे उद्भवणारे आजार मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आणि व्हायरल ताप इत्यादींचे प्रमाण वाढीस लागले आहे. मलेरियाचे 35 आणि लेप्टोचे 20 रुग्ण दाखल आहेत. तर, डेंग्यूचे रुग्ण आता कमी आहेत. पण, भविष्यात वाढू शकतात. दोन्ही तिन्ही आजार सोबत झाल्यास जिवास धोका उद्भवू शकतो. म्हणून नागरिकांनी अधिक खबरदारीने वागत सोशल डिस्टंसिंगसोबत डासांपासून वाचण्याच्या पद्धती अवलंबण्याची गरज आहे. 
- डॉ. दीपक मुंढे, अध्यक्ष, मार्ड, केईएम.

---

संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com